उद्या बैठकीचे आयोजन
प्रतिनिधी / बांदा:
महाविकास आघाडी सरकारने सक्षम वकील न दिल्याने सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. याला सर्वस्वी जबाबदार आघाडी सरकार असून आम्ही या सरकारचा तीव्र निषेध करत आहोत. मराठा समाजाचा संघर्ष हा यापुढेही सुरुच राहणार असून याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे सावंतवाडीचे नगराध्यक्ष तथा भाजपचे प्रवक्ते संजू परब यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
मराठा समाजाने आतापर्यंत संयमाची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात करोडोंच्या संख्येने मूकमोर्चे निघाल्यानंतर सर्वप्रथम भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण लागू केले. या विरोधात न्यायालयीन लढा देत सरकारने सक्षम वकिलांची फौज उभी करत न्यायालयात बाजू मांडली होती. मात्र, आतापर्यंतच्या संघर्षानंतर मिळविलेले आरक्षण आघाडी सरकारच्या कमकुवत भूमिकेमुळे रद्द झाले आहे.
कोर्टातील मराठा आरक्षण सुनावणी आघाडी शासनाने गांभीर्याने घेतली नाही. बाजूच मांडण्यात अपयश आल्याने त्याचा फटका समाजबांधवांना बसला आहे. मराठय़ांच्या संघर्षाला बांद्यातून सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून बुधवार 16 रोजी यासाठी समाजबांधवांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, उन्नती धुरी, जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, सभापती मानसी धुरी, उपसभापती शीतल राऊळ, सरपंच अक्रम खान, माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, भाजप मंडल अध्यक्ष महेश धुरी, मराठा समाज अध्यक्ष राजाराम सावंत, शहर अध्यक्ष राजा सावंत, माजी सरपंच मंदार कल्याणकर, डेगवे माजी उपसरपंच मधुकर देसाई, विशाल परब, ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर, जावेद खतीब, उमांगी मयेकर, श्याम सावंत, विनेश गवस, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.