प्रा. मनीषा नेसरकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ बेळगाव
मराठी भाषेची अवस्था बिकट आहे, असे गळे काढले जातात. आपली मराठी भाषा शिवरायांच्या शौर्याने, ज्ञानोबा- तुकोबांच्या संत साहित्याने तर साहित्यिकांच्या समृद्ध परंपरेने नटली आहे. जगभरात दहाव्या तर भारतात चौथ्या स्थानी मराठी भाषा बोलणाऱयांचे स्थान आहे. त्यामुळे ही भाषेबद्दलची नकारात्मकता बाजूला करून मराठीच्या डिजिटल स्वरूपाला आपलेसे करा, असे प्रतिपादन चन्नम्मा विद्यापिठाच्या मराठी विभागाच्या प्रा. मनीषा नेसरकर यांनी केले.
शब्दगंध कवीमंडळ व सरस्वती वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी शहापूर येथील वाचनालयाच्या माई ठाकुर सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. व्यासपिठावर सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा प्रा. स्वरूपा इनामदार व शब्दगंध कवीमंडळाचे अध्यक्ष प्रा. अशोक अलगोंडी उपस्थित होते.
आपल्या भाषेच्या सन्मानासाठी इतर भाषांवर अन्याय नको
प्रा. नेसरकर पुढे म्हणाल्या, इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे सर्वच भारतीय भाषा एकाच स्तरावर येऊन ठेपल्या आहेत. आपल्या भाषेच्या सन्मानासाठी इतर भाषांचा तिरस्कार करू नये. इंग्रज आपल्यासोबत इंग्रजी घेऊन आले. त्यामुळे इंग्रजी भाषेचे साहित्य आपल्या देशात समजू शकले. त्यामुळे त्यानंतरच्या काळात साहित्यात नवा प्रवाह पहायला मिळाला. त्यामुळे इतर भाषाही आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रा. अशोक अलगोंडी यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्मिता किल्लेकर यांनी परिचय करून दिला. निसर्ग साहित्य संमेलनाचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार कवी चंद्रशेखर गायकवाड यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांच्या सन्मान करण्यात आला. प्रा. निलेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सुधाकर गावडे यांनी आभार मानले. यावेळी साहित्य रसिक उपस्थित होते..