- मसापमध्ये कवी कुसुमाग्रज यांना अभिवादन
ऑनलाईन टीम / पुणे :
भाषा आणि संस्कृतीची स्पंदने प्रथम मनात उमटतात. नंतर ती उच्चारातून आणि कृतीतून प्रकटतात. केवळ दिखावूपणासाठी मराठीचे प्रेम नको. आंतरिक जाणिवेतून ते प्रकट होत राहिले तर भाषा आणि संस्कृती कधीच मरत नाही. माय मराठीचा जयजयकार करताना आपल्यातली मराठीपणाची ज्योत तेवत ठेवणे महत्त्वाचे आहे. असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते मराठी राजभाषा दिनानिमित्त कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कार्यवाह दीपक करंदीकर, बंडा जोशी, प्रा. माधव राजगुरू, वि. दा. पिंगळे, प्रमोद आडकर, पुणे शहर प्रतिनिधी सतीश देसाई आणि शिरीष चिटणीस यांनी कुसुमाग्रजांच्या कविता सादर करून त्यांना अभिवादन केले.
प्रा. जोशी म्हणाले, ‘आपल्याकडे भाषेचा संबंध ओठापुरता मर्यादित समजला जातो. भाषा ओठातून येण्यापेक्षा ती पोटातून येणे गरजेचे आहे. जेव्हा त्या भाषेत ती भाषा बोलणार्या भाषकाचे पोट भरण्याचे सामर्थ्य असेल तेव्हाच ती पोटातून येईल. भाषेचा प्रश्न केवळ अस्मितेशी निगडित असत नाही. तो ‘अस्तित्वाशीच’ जास्त निगडित असतो. त्यामुळे मराठी हा विषय घेऊन करिअर करू इच्छिणार्या मुलांना, केवळ पदवी देणे एवढ्याच कामात विद्यापीठांनी धन्यता न मानता, त्यांच्या पोटाचा प्रश्न सुटावा यासाठी नोकरीच्या आणि व्यवसायाच्या संधी त्यांच्यासाठी कशा निर्माण होतील, याकरिता चौकटीबाहेर जाऊन उद्योग-व्यवसाय क्षेत्राशी समन्वय साधला पाहिजे. त्यानुसार अभ्यासक्रमात बदल केले पाहिजेत. असे प्रयोग इतर सर्व ज्ञानशाखांमध्ये आज होत आहेत. भाषेचे शिक्षण म्हणजे केवळ ललित साहित्याचे शिक्षण नव्हे. व्यवहारात भाषा कशी वापरली जाते, शास्त्रीय लेखनात भाषेचे रूप कसे असते, विविध व्यवसायांत भाषा कशी वापरतात, साहित्यकृतींमध्ये भाषेची अभिव्यक्ती कशी होते याचे शिक्षण दिले गेले पाहिजे.
2020 साली भारत महासत्ता होणार हा जसा एक फुगा होता आणि महानगरातल्या महिन्याला लाख रुपये पगार मिळविणार्या काही तरुणांकडे पाहून तो फुगविला जात आहे, तर दुसरीकडे पदवीधर झालेल्या अनेक तरुणांना नोकरीही मिळणे कठीण झाले आहे. हे स्वीकारायला कठीण असले तरी वास्तवच आहे. मराठी जगते आहे की मरते आहे? या संदर्भातले निष्कर्ष आणि अनुमान केवळ शहरांतील मराठीच्या अवस्थेवरून आपण काढणार आहोत का? हा खरा प्रश्न आहे. शहरातली मराठी भाषेची प्रकृती ठीक नाही हे मान्य केले तरी मराठीच्या दुरवस्थेविषयी गळे काढण्याची आवश्यकता नाही. जागतिकीकरणानंतर आणि तंत्रज्ञानाचा विस्फोट झाल्यानंतर एकूणच जागतिक जीवनशैलीत जे बदल झाले आहेत त्याचे परिणाम त्या त्या राष्ट्रातल्या भाषा आणि संस्कृतीवरही झाले आहेत. त्यामुळे भाषा आणि संस्कृतीचा पोत बदलत असला तरी त्या नष्ट होतील याची भीती बाळगण्याचे कारण नाही.’