उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचे प्रतिपादन
पेडणे / ( महादेव गवंडी)
मराठी ही आमच्या हृदयातील भाषा आहे. कोकणी जशी गोव्याची राजभाषा झाली तशीच मराठीही गोव्याची राजभाषा व्हावी. पोर्तुगीज राजवटीतही मराठी भाषेतून पत्रव्यवहार व्हायचा. त्यामुळेच पोर्तुगीज राजवटीतही मराठी भाषा टिकून राहिली. या भाषेचा महिमा आणि थोरवी मोठी असून ही भाषा यापुढेही अजरामर राहणार आहे. मराठीसाठी कधीही हाक द्या मदतीसाठी आपण नेहमीच पुढे असेन, असे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर म्हणाले.
गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या 28 व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे संत सोहिरोबानाथ नगरीत उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष विजय कापडी, सन्माननीय अतिथी डॉ. सदानंदराव मोरे (संत साहित्याचे गाढे अभ्यासक व संत तुकारामाचे आठवे वंशज), स्वागताध्यक्ष दयानंद सोपटे (आमदार मांदे मतदार संघ), गो. सा. से. मं. चे अध्यक्ष रमेश वंसकर, कार्याध्यक्ष राजमोहन शेटये आदी उपस्थित होते.
साहित्यिकांनी जातीयवाद नष्ट करण्यासाठी जागृती करावी
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर म्हणाले, माझी मातृभाषा मराठी आहे. पेडणे ही कलाकारांची खाण आहे. पेडणेत हे संमेलन होत आहे ही साहित्यिक आणि पेडणेकरांना मेजवानी आहे. साहित्यिक व कलाकारांसाठी सरकार अनेक योजना राबवित आहे. साहित्यिकांनी जातीयवाद नष्ट करण्यासाठी समाजात जागृती करावी आणि समाजात बदल घडवून आणावा. साहित्यिकांना ज्याप्रमाणे मान देतात त्याप्रमाणे राजकारण्यांनाही मान द्या, असे आवाहनही उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी केले.
वाचन संस्कृतीचे जतन करा ः स्वागताध्यक्ष आमदार दयानंद सोपटे
कोरोना संसर्गाला पावणे दोन वर्षे होत आहेत तरी मनाची जिद्द बाळगून हे संमेलन आज यशस्वी होत आहे. पेडणे महाल हा कला क्रीडा आणि साहित्यसंपन्न असा महाल आहे. आज हे 28 वे मराठी साहित्य संमेलन होत आहे ही अत्यंत आनंददायी बाब आहे. मराठी साहित्य क्षेत्रात अनेकांनी आपली नाममुद्रा उमटविली आहे. वाचन संस्कृती कुठे तरी कमी होत असल्याने मराठी साहित्यिकांची पुस्तके युवकांना वाचनासाठी देणे आवश्यक आहे. युवा पिढीमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे आवश्यक आहे. मराठी संमेलनासाठी माझी स्वागताध्याक्ष म्हणून माझी निवड झाली हा माझा मान आहे. युवकांना मराठीची गोडी लावावी यासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ देऊन मराठीची पताका फडकावी, असे आवाहन स्वागताध्यक्ष आमदार दयानंद सोपटे यांनी केले.
मराठी राजभाषेसाठी सर्वांचेच प्रयत्न आवश्यक ः विजय कापडी
मोठय़ाप्रमाणात आपल्याकडे मराठी लिहिली जाते, वाचली जाते, गायिली जाते. मराठीत होणारी साहित्यनिर्मिती आणि मिळणारे विविध पुरस्कार तर सोडाच पण खुद्द राजकारण्यांच्याबाबतीतही निवडणुकीच्या प्रचार साहित्याची भाषा म्हणून मराठीचाच अधिकतर उपयोग केला जातो. परंतु तिला राजभाषेचा मान देण्याच्या बाबतीत सरकारी पातळीवरून अक्षम्य अशी दिरंगाई दिसत आहे. मायभाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा म्हणून सर्वांचेच प्रयत्न आवश्यक आहेत, असे संमेलनाध्यक्ष विजय कापडी म्हणाले.
संमेलन हे मराठी अस्मितेचे प्रतीक ठरणार ः कार्याध्यक्ष राजमोहन शेटय़े
12 वर्षानंतर हे संमेलन पेडणेत भरत आहे. हे मोठे भाग्य आम्हाला लाभले आहे. पेडणेच्या भूमीत अनेक रत्ने तयार झाली. अनेक साहित्यिकांनी मराठीची पताका पुढे नेली आहे. नवीन विचारांना नवी दिशा मिळावी म्हणून या संमेलनात युवक युवकांना स्थान दिले आहे. साहित्य प्रकारातील विविध प्रकार तसेच विविध कलांना या संमेलनात समावून घेतले असल्याने सर्वांच्या अथक परिश्रमाने यश आले आहे. मराठी अस्मितेचे हे ऐतिहासिक प्रतीक म्हणून स्मरणात राहिल, असे कार्याध्यक्ष राजमोहन शेटये म्हणाले.
गोमंतक साहित्यिक सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात पेडणेच्या भूमीत हे 28 वे संमेलन होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
ग्रंथ दिंडीने संमेलनाची सुरुवात
संमेलनाची सुरुवात दुपारी 3 वा. मोरजाई दिंडी पथकाने झाली. ही ग्रंथ दिंडी श्री भगवती मंदिरापासून संमेलन स्थळापर्यंत आली. लहान मुलांनी ज्ञानेश्वर , तुकाराम या संताची वेशभूषा परिधान करुन दिंडीला शोभा आणली.
‘पुनव’ स्मरणिकेचे प्रकाशन
मान्यवरांच्या हस्ते पुनव या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी स्मरणिकेचे संपादक नारायण महाले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्मरणिकेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांना धन्यवाद दिले.
पुस्तक प्रकाशन सोहळा
गुरुदास नाटेकर यांच्या ‘काळीज हाक’, दयाराम पाडलोस्कर यांचे ‘बवाळ’,
दशरथ परब यांच्या ‘भाव अंतरीचे’, विनोद नाईक यांचे ‘नंदादीप’, राजमोहन शेटये यांच्या ‘स्पंदने मनाची’, रमेश वंसकर यांच्या ‘शाळा फुटली पाटी फुटली’, तुकाराम शेटगावकर यांच्या ‘विचार वैभव’, अवधूत कुडतरकर यांच्या ‘यशवंत’ दिवाळी अंकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
दरम्यान, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचा रुपये दहा हजार पुरस्कार तुळशीदास काणकोणकर यांना प्रदान करण्यात आला.
सत्कार सोहळा
विठ्ठल कोरगावकर, निवृत्त शिक्षिका वैशाली डुबळे, ज्ये÷ साहित्यिक अवधूत कुडतरकर, शरदचंद्र देशप्रभू, साहित्यिक प्रकाश प्रभुदेसाई, पत्रकार प्रकाश तळवणेकर, किसन फडते (मरणोत्तर), महादेव काशिनाथ परब आदी मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
अशोक नाईक तुयेकर यांना सुवर्णपदक
साहित्य सेवक मंडळातर्फे देण्यात येणारे सुवर्णपदक मराठी साहित्यात विपूल लेखन केलेले साहित्यिक अशोक नाईक तुयेकर यांना विजय कापडी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
पेडणे ही शूरवीरांची तसेच कला भूमीः डॉ. सदानंद मोरे
देशासाठी ज्यांनी योगदान दिले त्यात पेडणेच्या भूमीतील जीवबादादा केरकर यांचे मोठे योगदान आहे. या पेडणे भूमीत अनेक रत्ने जन्माला आली आणि त्यांनी साहित्य कला आणि अन्य क्षेत्रात नाममुद्रा उमटविली आहे, असे डॉ. सदानंद मोरे भाषणात म्हणाले.
उद्घाटन सत्राचे सूञसंचालन गोविंद भगत यांनी केले. भक्ती धुपकर यांनी ईशस्तवन सादर केले. आभार चंद्रकांत सांगळे यांनी मानले.
उद्घाटन सत्रानंतर परिसंवाद झाला.
विषय ः 2000 नंतरचे गोमंतकीय मराठी साहित्य, या परिसंवादाचे अध्यक्ष परेश प्रभू होते. कथा या विषयावर डॉ. जयप्रभू कांबळे, राजू नाईक (बालसाहित्य), प्रा. अरुण नाईक (ललित आणि कविता), प्रा. विनय बापट (कादंबरी) यांनी सहभाग घेतला.
कविसंमेलन उत्साहात
निवडक कवींचे कविसंमेलन अध्यक्ष अरुण इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यात पुष्पाग्रज, दशरथ परब, पौर्णिमा देसाई, शीतल साळगावकर, शर्मिला प्रभू, विनोद नाईक, लक्ष्मण पित्रे, दुर्गाकुमार नावती, महेश पारकर, शंभू भाऊ बांदेकर, कविता बोरकर, माधव सटवानी, प्रकाश क्षीरसागर, गौरी भालचंद्र, चंद्रशेखर गावस, मंगेश काळे, निवृत्ती शिरोडकर, प्रकाश तळवडेकर, दयाराम पाडलोस्कर, हिरा गावकर, श्रद्धा गवंडी, नूतन दाभोलकर, मुरलीधर बर्डे, शेखर खांडेपारकर या कवीनी सहभाग दर्शविला. त्यानंतर सवेश नाटय़ सादरीकरण करण्यात आले. (एकूण पाच नावाजलेल्या संगीत चारसा जपलेल्या नाटकांचे प्रवेश सादरीकरण करण्यात आले. यामध्ये गुरुकृपा संगीत संस्था तांबोसे (संगीत मंदारमाला) . श्रींची इच्छा थिएटर्स, हरमल (चांदणे शिंपीत जा),
अभिनव कला थिटर्स मांदे (ययाती आणि देवयानी), सार्वजनिक गणेश उत्सव सांस्कृतिक आणि क्रीडा संघ, मोरजी (शिक्का कटय़ार) हे सवेश सादर करण्यात आले