महाराष्ट्र विधानपरिषदेत कर्नाटक सरकारचा निषेध ठराव संमत
प्रतिनिधी/ मुंबई
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिक जनतेवर अन्याय होत असताना हा अन्याय दूर करण्यासाठी पेंद्र सरकारने हस्तक्षेप करायला पाहिजे, अशी भूमिका सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधानपरिषदेत मांडली. दि. 17 डिसेंबर रोजी बेंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनप्रकरणी निषेधाचे निवेदन शिंदे सादर करत होते. यावेळी कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. शेकापचे जयंत पाटील यांनी सकाळच्या सत्रात हा मुद्दा उपस्थित करत सरकारने भूमिका मांडण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने शिंदे यांनी हा ठराव मांडला.
17 डिसेंबर रोजी बेंगळूरमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्य़ाची विटंबना करण्यात आली. यावर निषेधाचे पडसाद बुधवारी विधानपरिषदेत उमटले. एकनाथ शिंदे म्हणाले, हे दुर्दैवी कृत्य झाले असून शिवप्रेमी जनता माफ करणार नाही. या घटनेकडे सर्वांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी ही क्षुल्लक घटना म्हणून उल्लेख केला. त्यांच्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध होत आहे. विटंबना घटना जाणीवपूर्वक होती का? अशी शंका शिंदे यांनी उपस्थित केली. येथील सीमाप्रश्न सात दशकाहून अधिक काळापासून संविधानिक मार्गाने सोडविण्यासाठी प्रयत्न होत आहे. तरीही तेथील सरकार मराठीपाटय़ा हटविणे, भाषा हटविणे असे प्रयत्न करत आहे. येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे राज्य हटविण्याचे पाप तेथील राज्य सरकारने केले. सीमाभागातील जनतेवर हल्ले सुरू आहेत. यातून कर्नाटक सरकार दडपशाही करत आहे. मात्र सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र जनता आहे. तरीही महाराजांचा पुतळा हटविण्याचे काम रात्री करण्यात आले. याहून घृणास्पद प्रकार म्हणजे 17 डिसेंबर रोजी झालेल्या निषेधार्ह कृत्याला तेथील सरकारने पाठीशी घालण्याचे काम सुरू केले आहे.
नुकतेच केंद्रातील भाजपचे नेते अमित शहा महाराष्ट्रात आले. यावेळी महाराजांचा उल्लेख केला. मात्र त्या निषेधार्ह घटनेबाबत चक्कार शब्दही काढला नसल्याचे शिंदे यांनी निवेदनात म्हटले. त्यामुळे येथील सरकारच्या विरोधात पेंद्र सरकारने हस्तक्षेप करून न्याय देणे गरजेचे असल्याचे शिंदे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असून सीमाभागाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. मात्र अशावेळी मराठी भाषिक बहुल परिसरातील जनतेच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचा शिंदे यांनी पुनरुच्चार केला.
छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचेच आदर्श
दरम्यान शेकापचे जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाने जैसे थे असे सांगितले असताना अशा घटना घडत आहेत. असे प्रकार थांबविले पाहिजेत, असे म्हणणे मांडले. दरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचेच आदर्श आहेत. सरकार कोणतेही असले तरीही महाराष्ट्र सीमाभागातील जनतेच्या पाठीशी आहे. विटंबना प्रकरणातील नराधम कोण याची स्पष्टता आणणे गरजेचे असल्याचे सांगत या विषयांचे राजकारण करून गांभीर्य कमी करू नये. यावर तपशीलवार चर्चा व्हावी. राज्य सरकारच्या या भूमिकेला समर्थन असल्याचे दरेकर यांनी सांगितले. यावर सभापती रामराजे निंबाळकर यांनी या विषयावर एक तासाची चर्चा घेण्यात येईल, असे सांगितले.