गेल्या वषी याच सुमाराला कोरोनाची पहिली लाट आलेली आठवते. लॉकडाऊन आले. छोटेमोठे व्यवसाय बंद पडले. लोकांची कामे गेली. कोरोनामुळे जीवच जायचा असेल तर बायकोमुलांच्या सहवासात जाऊन मरू अशा हताश भावनेने लाखो परप्रांतीय मजूर मिळेल त्या वाहनांनी किंवा पायी घराकडे निघाले.
मराठी भाषिकांच्या समाज माध्यमांवरच्या प्रतिक्रिया आठवतात. कुणी म्हणाले की महाराष्ट्र ही त्या मजुरांची कर्मभूमी असताना त्यांनी इथून जाणे चुकीचे आहे. कुणी म्हणाले की त्यांना जाऊ द्या. आता परत आले नाहीत तरी चालेल. इथल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळेल.
मलाही कुतूहल वाटले होते. इथली सारी कष्टांची कामे मराठी मजूर करू लागले आणि त्यांनी सारा अवकाश व्यापला तर काय होईल. “भैय्या, कैसा भाव दिया, कुछ कम करो,’’ वगैरे वाक्मये शुद्ध मराठीत उच्चारावी लागतील, “हे बंधो, या वस्तूचे विक्रय मूल्य तू अंमळ जास्तच सांगतो आहेस, यात काही सवलत देऊ शकशील का?’’ यावर तो उत्तर देईल, “ही वस्तू घाऊक भावात मलाच इतक्मया किमतीत घ्यावी लागलीय. तुम्ही माझे प्रारंभीचे–बोहनीचे-ग्राहक आहात. मी जास्तीत जास्त इतके रुपये कमी करू शकेन. माझ्याही निर्वाहाचा काही विचार करा.’’ सायंकाळी सुंदर ललना फिरायला निघाल्यावर त्यांना वाटेत पाणीपुरीची गाडी दिसेल. गाडीचा तरुण मराठी मालक चायनीज मोबाईलवर फेसबुक उघडून चिनी मालावर बहिष्काराच्या आवाहनाची पोस्ट लाईक करीत असेल. तरुणींचा ताफा आल्यावर तो खट्टू होऊन मोबाईल बाजूला ठेवील आणि तरुणींच्या हातात एकेक बशी देईल. कुठले तरी मराठी भावगीत किंवा नाटय़गीत गुणगुणत तो प्रत्येकीला तिच्या तिखट-गोडच्या फर्माईशीनुसार एकेक पुरी देत राहील. पुऱयांची नियोजित संख्या पूर्ण झाल्यावर त्यांना सुकी मसाला पुरी देऊन त्यांच्या बशा स्वच्छ धुवून पुसून ठेवील. स्वच्छता, टापटीप, त्याच्या ओठांवरचे मराठी गाणे आणि बिलाची रक्कम शुद्ध भाषेत ऐकल्यावर एखादी नाराज नारी पुटपुटेल, “काही असो… आज पाणीपुरी खाल्ल्यासारखं वाटलंच नाही, बाई.’’
पण असे झाले नाही. ‘मी पुन्हा येईन,’ अशी धमकी न देता कोरोना पुन्हा आला. गेल्या वषी सगळा अवकाश मराठी माणूस व्यापून टाकील, असे आम्हाला पडलेले स्वप्न, त्यातली मराठी माणसे कुठे आहेत?