प्रतिनिधी /फोंडा
जाज्वल्य मराठीप्रेमी, लेखक व विचारवंत रामनाथ ग. नाईक (71 वर्षे) यांचे मंगळवार 25 रोजी उशिरा रात्री बांबोळी येथील गोमेकॉत निधन झाले. मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या नाईक यांना गेल्या आठवडय़ात गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले व उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी दुपारी फोंडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोमंतक मराठी भाषा परिषदेचे माजी अध्यक्ष असलेल्या रामनाथ नाईक यांनी कोकणी-मराठी भाषावाद व एकंदरीत समाजाची मानसिकता या विषयाला धरुन स्थानिक वृत्तपत्रे व नियतकालिकातून विपुल लेखन केले. त्यांच्या विचारात सुस्पष्टता व लेखनात आक्रमकता होती. मराठीची बाजू मांडताना ते कुणाचाही मुलाहिजा न राखता लेखणीतून परखडपणे तुटून पडत. 1997 पासून एका स्थानिक दैनिकात ‘प्रतिवाद’ या नावाने प्रसिद्ध होणारे त्यांचे स्तंभलेख प्रचंड गाजले. बहुजनांसाठी स्वातंत्र्य निरर्थक ठरले आहे, असे आग्रही मत ते या लेखनातून मांडत. पुढे याच निवडक लेखसंग्रहावर आधारीत ‘गोमंतशारदास्र’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले. ‘कृतज्ञ मी, कृतार्थ मी’ हे स्वातंत्र्य सैनिक डॉ. जुझे फ्रान्सिस मार्टीन्स यांचे इंग्रजीतील आत्मचरित्र त्यांनी मराठीत अनुवादीत केले. सन् 2003 साली ‘गोव्याच्या राजभाषावादामागील कारस्थान’ या पुस्तकाने बरीच खळबळ माजवली. या पुस्तकामुळे भाषावादाच्या चळवळीला एक वेगळेच वळण मिळाले. त्यावर संपूर्ण गोवाभर चर्चाही झाली. शिवाय महाराष्ट्रातील पुरोगामी लेखकानीही त्याची विशेष दखल घेतली.
मूळ उंडिर बांदोडा येथील रामनाथ नाईक हे सध्या फोंडय़ात वास्तव्यास होते. सुरुवातीचा काही काळ शिक्षकीपेशा व त्यानंतर प्रदीर्घ काळ बँक ऑफ बरोडा या राष्ट्रीयकृत बँकेत त्यांनी नोकरी केली. दहा वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस म्हणूनही ते कार्यरत होते. गोमंतक मराठी भाषा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द संस्मरणीय ठरली. त्यांच्या वृत्तपत्रीय स्तंभ लेखनासाठी 1994 व 1997 साली गोमंतक मराठी अकादमीचा सर्वोत्कृष्ट लेखनसाठी पत्रकारिता पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. त्यांच्या निधनाबद्दल मराठी भाषा प्रेमींनी दुःख व्यक्त केले आहे. भाषा वादाच्या चळवळीतील आक्रमक लढवय्या काळाच्या पडद्याआड गेला, अशा प्रतिक्रिया मराठी भाषा वर्तुळातून व्यक्त होत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक पुत्र व दोन मुली असा परिवार आहे.