प्रा. अजित सगरे यांचे प्रतिपादन : 24 वे माचीगड येथील मराठी साहित्य संमेलन साधेपणाने
खानापूर / वार्ताहर
आज भाषा, साहित्य आणि संस्कृती ही माणसांची व समाजाची अस्मिता म्हणून ओळखली जाते. तिचे संवर्धन आणि विकासासाठी लोक लढा उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी गावोगावी होणारी संमेलने ऊर्जा देण्याचे काम करत आहेत. साहित्य माणसाला जगण्याचे बळ देते. समाजाचे प्रश्नही सोडविते, म्हणून साहित्य संमेलनातून विचार-विवेक आणि आत्मनिर्भरता यांचा जागर होतो. यामुळे सांस्कृतिक दहशतवाद नष्ट करण्यास मदत होते, असे प्रतिपादन प्रा. अजित सगरे यांनी केले. ते श्री सुब्रमण्य साहित्य अकादमी माचीगड-अनगडी यांच्यावतीने आयोजित 24 व्या मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून केले.
प्राध्यापक सगरे म्हणाले, सीमाभागात होणारी 17 संमेलने मराठी भाषा व संस्कृती संवर्धनाची प्रभावी माध्यमे आहेत. या संमेलनांची माहिती महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात पोहोचली आहे. कोरोनामुळे संमेलने साधेपणाने होत असली तरी आचार-विचारांचा जागर खंडित न होता पुढे अव्याहतपणे सुरू ठेवण्यासाठी ज्या विचारातून संमेलनाचा प्रपंच मांडला आहे तो कौतुकास्पद असल्याचे सांगितले. ग्रामीण संमेलनामुळे आपल्या परिसरातील चांगलं लिहिणारे, चांगलं बोलणारे आणि उत्तम व्यक्त होणारे नवसाहित्य उजेडात येण्यास मदत मिळते. यामुळे साहित्याच्या विश्वात मोठी भर पडते. ही प्रादेशिक भाषांच्या संवर्धनाच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बाब असल्याचे सांगितले.
अकादमीचे अध्यक्ष बाबुराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ते म्हणाले, खानापूर तालुक्मयातील एकमेव साहित्य संमेलन असलेल्या माचीगड संमेलनाकडे तालुक्मयातील साहित्यप्रेमींचे लक्ष लागून असते. यावषी कोरोनाचा अडसर आल्याने दरवषीच्या परंपरेला साजेसे संमेलन घेता आले नाही. पण साहित्य व विचारांच्यात खंड पडणार नाही याची दखल घेऊन यंदाचा साहित्य सोहळा साधेपणाने करत असल्याचे सांगितले. तसेच वर्षभर मराठी भाषा व साहित्याच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम हाती घेण्यासाठी बांधिल असल्याची ग्वाही दिली.
पाटील यांनी गणेश फोटोपूजन केले. ईश्वर बोबडे यांनी सरस्वती फोटोपूजन केले. विलास पाटील यांनी संत तुकाराम महाराजांच्या फोटोचे पूजन केले. मष्णू चोर्लेकर यांनी ज्ञानेश्वर फोटोपूजन केले. साहित्यिक प्रल्हाद मादार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. माजी जिल्हा पंचायत सदस्य पुंडलिक कारलगेकर, बाबुराव पाटील, प्रा. अजित सगरे, नारायण मोरे, विठोबा भेकणे, महादेव मोरे आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
मणतुर्गा सूर्योदय ग्रुपच्यावतीने संत साहित्य आणि अभंग यावर आधरित अडीच तासाचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. तबल्यावर मष्णू चोर्लेकर तर संवादिनीवर स्वरा पाटील यांनी साथ दिली.
प्रारंभी गावातून शालेय विद्यार्थी, वारकरी व महिलांनी ग्रंथदिंडी काढून संमेलनाची सुरुवात केली. संपूर्ण संमेलन काळात सामाजिक अंतर आणि नियमांचे पालन करून संमेलनाचा थाट कायम ठेवल्याने साधेपणाने पार पडलेल्या या संमेलनाची रंगत आणखी वाढली. बाल शिवाजी कला मंच मणतुर्गा यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून साधेपणाने गावमर्यादित हा साहित्य सोहळा साजरा करण्यात आला. सूत्रसंचालन अकादमीचे कार्याध्यक्ष संजीव वाटुपकर यांनी तर सचिव एम. पी. गिरी यांनी आभार मानले.