डॉ. विनोद गायकवाड यांचे प्रतिपादन : राणी चन्नम्मा विद्यापीठात मराठी साहित्य मंडळाचे उद्घाटन
प्रतिनिधी / बेळगाव
मराठी भाषा आपल्या जगण्याचे साधन आहे. मराठीत पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर अनेक क्षेत्रात आपल्याला नोकरीची दारे खुली होतात. मात्र त्याचा योग्य तो वापर विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. स्पर्धा परीक्षा हा एक उत्तम पर्याय असून त्यामध्ये आपल्याला अधिकारी पदापर्यंत पोहचता येते, असे विचार डॉ. विनोद गायकवाड यांनी मांडले.
राणी चन्नम्मा विद्यापीठातील मराठी विभागातर्फे मराठी साहित्य मंडळाचे उद्घाटन व नूतन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ पार पडला. विभागाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर मराठी विभागप्रमुख डॉ. मनीषा नेसरकर, डॉ. चंद्रकांत वाघमारे, साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय कांबळे, डॉ. मैज्जोद्दिन मुतवल्ली उपस्थित होते.
साहित्य मंडळातर्फे वर्षभरात राबविण्यात येणाऱया कार्यक्रमांची आखणी करण्यात आली. एम. ए. प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचे स्वागत पल्लवी कदम हिने केले. यावेळी तेजस्विनी कांबळे, प्रशांत पाटील, किरण होनगेकर, अशोक आलगोंडी, सातेरी कांबळे, नागराज हुरूडे, पूजा कोले, राजश्री मंडलिक, संतोष मादाकाचे उपस्थित होते. सूत्रसंचालन जोतिबा कडेमणी व महादेव खोत यांनी केले. प्रभावती आजरेकर यांनी आभार मानले.