मध्यवर्ती म. ए. समितीचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आणि सीमलढय़ाच्यादृष्टिने महापालिका निवडणूक ही महत्त्वाची आहे. मात्र आता काही ठिकाणी मराठी भाषिक मोठय़ा संख्येने ही निवडणूक लढवत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. काही ठिकाणी गल्लीतील पंचमंडळी तसेच नागरिक वॉर्डासाठी एकच उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना सर्वांनी सहकार्य करावे आणि एकजुटीने ही निवडणूक लढवून महापालिकेवर मराठी भाषिकांची सत्ता आणावी, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले. मराठी भाषिक अधिक उमेदवार झाल्यास मराठी मतांची विभागणी होणार आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करावा. मराठी जनतेचा आवाज दडपून टाकण्यासाठी कर्नाटक सरकार व प्रशासनाने डाव रचला आहे. वॉर्डाची पुनर्रचना व तोडफोड करुन हा कुटील डाव आखला आहे. तेव्हा याचा साऱयांनीच विचार करावा आणि एकजुट दाखवावी, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.