ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
मराठी भाषेत मोठी वैचारीक संपदा असून या भाषेचे वैभव वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे आवाहन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आज ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’च्या उद्घाटन प्रसंगी केले.
महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने 1 ते 15 जानेवारी 2020 दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’चे आयोजन करण्यात आले असून आज महाराष्ट्र सदनात डॉ. मुळे यांच्या हस्ते पंधरवडाचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यावेळी मंचावर उपस्थित होते.
यावेळी डॉ.मुळे म्हणाले, महाराष्ट्राचे भौगोलिक व सांस्कृतिक वैविद्य जपत मराठी भाषेत मोठी वैचारीक संपदा निर्माण झाली आहे. या भाषेने विविध लोककलांना जन्म दिला, या भाषेत नाटक,कविता असे अनेकानेक साहित्य लिहील्या गेले असून ही वैचारीक संपदा जपत मराठीचे वैभव वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. महाराष्ट्राबाहेर राहणारा मराठी माणूस हा या भाषेचा दूत आहे म्हणून हे वैभव वाढविण्यात त्याची महत्वाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखीत केले.
महाराष्ट्राबाहेर जिथे-जिथे मराठी माणसं आहेत तिथे त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमांतून मराठी भाषेच्या संवर्धनात सहभाग घेतला पाहिजे. मराठी सोबतच देशातील अन्य भाषांतील साहित्यांचीही देवाण घेवाण या निमित्ताने व्हावी असेही डॉ. मुळे म्हणाले.