नावशी-बांबोळीतील ग्रामस्थांची मागणी
प्रतिनिधी/ पणजी
नावशी-बांबोळी येथील नियोजित मरिना प्रकल्पास तेथील ग्रामस्थांनी जोरदार विरोध दर्शवला असून 26 जुलै रोजी आयोजित केलेली सुनावणी रद्द करावी अशी मागणी केली आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांना सदर मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्या सहीने सादर करण्यात आले आहे.
गोयंकार अगेन्स्ट मरीना असा गट तेथील ग्रामस्थांनी स्थापन केला असून त्या गटातर्फे हे निवेदन देण्यात आले आहे. दोनापावला ते आगशी या सुमारे 10 कि. मी. च्या किनारपट्टी भागात या प्रकल्पाची व्याप्ती असून तो भाग मासळी प्रजनन क्षम म्हणून जैविक संवेदनशील आहे.
तेथे 300 पेक्षा जास्त विविध प्रकारची मासळी असून त्यावर तेथील मच्छिमार बांधव त्यांचे कुटुंबांचे पोट अवलंबून आहे. तेथील बहुतांश लोक एसटी गटाचे आहेत. हा प्रकल्प झाला तर त्यांची घरे, पोट हे सर्व काही चिरडणार अशी भिती निवेदनातून प्रकट करण्यात आली आहे.
ग्रामस्थांना स्थानिक पंचायतीना याबाबत पूर्ण अंधारात ठेवण्यात आले असून त्यांना कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. या प्रकल्पाचा पर्यावरणावर मोठा विपरीत परीणाम होणार असून तेथील मासळी पूर्णपणे नष्ट होणार असल्याची माहिती निवेदनातून देण्यात आली आहे. हा प्रकल्प रद्दच करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या प्रकल्पाच्या अभ्यास परीणामासाठी एनआयओची नेमणूक करण्यात आली होती पण तो अभ्यास एनआयओने केलाच नाही. अन्नमलाई विद्यापीठाला अभ्यास अहवाल तयार करण्याचे काम देण्यात आले होते त्यांनी सर्वेक्षण न करताच बोगस अहवाल तयार केला असेही निवेदनातून निदर्शनास आणले आहे. भाटी, कुडका, गोवा-वेल्हा, आगशी, पाळी-शिरदोण, कुठ्ठाळी अशा अनेक पंचायतींना या प्रकल्पाचा मोठा फटका बसणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. हा प्रकल्प नकोच तेव्हा 27 जुलैची सुनावणी नको निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.