प्रतिनिधी / कराड
मलकापुरात कोरोना रूग्णांची साखळी तुटता तुटेना झालीय. सोमवारी अहिल्यानगर परिसरातील एका महिलेसह पुरूषाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या परिसरासह संपूर्ण शहरावर कोरोनाची दहशत पसरली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होऊ लागली आहे.
एका बाजूला कोरोना रूग्णांची संख्या वाढल्याने धडकी भरत असतानाच दुसरीकडे जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
मलकापूरच्या हद्दीत आगाशिवनगरला 19 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण सापडला होता. बाबरमाची येथील कोरोना रूग्णाच्या संपर्कात आल्याने त्या रूग्णाला कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात येत होते. हा रूग्ण नामांकित रूग्णालयाच्या सिव्हिल डिपार्टमेंटमधे कामाला होता. त्यानंतर या विभागात काम करणाऱया रूग्णांची संख्या वाढत गेली. ते सर्व आगाशिवनगर व मलकापूरच्या अहिल्यानगर परिसरातील आहेत. ही साखळी वाढतच आहे. या साखळीतील काही रूग्णांच्या निकट सहवासातील 11 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. सोमवारी याच साखळीतील एका महिलेसह पुरूषाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या साखळीतील कोरोना रूग्णांची संख्या 13 वर पोहोचली आहे. या व्यतिरिक्त आगाशिवनगर येथील महिलेची उपजिल्हा रूग्णालयात प्रसुती झाली. त्या महिलेलाही कोरोना असल्याचे समोर आले. त्या महिलेच्या शेजारील एका व्यक्तीलाही कोरोना असल्याचे समोर आले. त्यामुळे मलकापुरात कोरोना रूग्णांची संख्या एकुण 15 झाली आहे.
सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांसह त्यांच्या निकवर्तीयांना 28 एप्रिल रोजीच विलगीकरणात दाखल करण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट सोमवारी प्राप्त झाले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने आणखी ठोस पावले उचलण्याची मागणी आता होऊ लागली आहे.
तरीही नागरिकांकडून नियमांची पायमल्ली
मलकापूर शहरात रूग्णांची संख्या 15 वर पोहचली असतानाही काही नागरिकांना गांभीर्य नसल्याचे दिसते. संपूर्ण शहर सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे घराच्या आत आहे. मात्र काही बेफिकीर नागरिक सर्रासपणे नियम तोडत आहेत. विनामास्क रस्त्यावर फिरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकसाठी बाहेर पडणे यामुळे कोरोनाची दहशत वाढत चालली आहे. अशा बेफिकिर नागरिकांवर प्रशासन कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.