प्रतिनिधी / खानापूर
खानापुरातून वाहणारी मलप्रभा नदी देशातील बारा पवित्र नद्यांपैकी एक मानली जाते. यामुळे मलप्रभा नदीघाटावर दर मंगळवार, शुक्रवार किंवा अमावस्या व पौर्णिमेला स्नानासाठी येणाऱया भाविकांची संख्या मोठी असते. अशावेळी मलप्रभा नदीघाटावर बराच कचराही निर्माण होतो. त्यातच अनेकजण आपल्या घरातील जुने देव देवतांचे फोटोही या नदीघाटावर सोडून जातात. अनेक लोक रक्षा विसर्जनासाठीही येत असतात. यामुळे नदीपात्र व घाटही अस्वच्छ होतो. निर्माल्य टाकण्यासाठी नदीघाटावर कुंडही ठेवले आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष करुन अनेक लोक निर्माल्यही नदीपात्रातच टाकतात. वास्तविक मलप्रभा नदीघाट परिसर नेहमी स्वच्छ ठेवणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. नगरपंचायतीनेदेखील स्वच्छता कामगारांच्याकडून काम करुन घेणे गरजेचे आहे. पण नगरपंचायतीलाही त्याचे गांभीर्य नाही. यामुळे आता विविध सेवाभावी संस्था, युवक मंडळे व्हॉटसऍप ग्रुपचे कार्यकर्ते श्रमदानाने घाटाची स्वच्छता करीत असतात.
धारकऱयांकडून नदीघाटाची स्वच्छता
यामध्ये शिवप्रतिष्ठान हेंदुस्थानचे धारकरी देखील मागे नाहीत. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे नुकताच बलिदान मास साजरा केला. या मासातील रक्षाविसर्जनासाठी खानापूर, नंदगड, येळ्ळूर परिसरातील धारकरी मंगळवारी सकाळी मलप्रभा नदीघाटावर एकत्र आले होते. त्यांनी रक्षा विसर्जन करतच श्रमदान करुन मलप्रभा नदीघाट स्वच्छ केला. नदीपात्रातील कचराही बाजूला केला. देवदेवतांचे फोटोही वेगळे करुन संपूर्ण घाट परिसर स्वच्छ केला. श्रमदानात जवळपास 50 धारकरी होते.