15 दिवसात बिले न दिल्यास आंदोलन, रयत संघटनेचा इशारा
प्रतिनिधी / खानापूर
एम. के. हुबळी येथील मलप्रभा साखर कारखान्याने तसेच खानापूरच्या लैला शुगर्स (भाग्यलक्ष्मी) कारखान्याने ऊस बिलांची त्वरित पूर्तता करावी, येत्या पंधरा दिवसात ऊस बिलाची पूर्तता न झाल्यास रयत संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशारा खानापूर तालुक्यातील रयत संघटनेचे नेते गुरुलिंगय्या पुजार यांनी खानापूर येथील सरकारी विश्रामधामात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे. यासंदर्भात दोन्ही साखर कारखान्यांना निवेदनही दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मलप्रभा साखर कारखान्याच्या गेल्या निवडणुकीत नाशीर बागवान यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या हाती सभासदांनी सत्ता दिली. त्यावेळी त्यांनी ऊस बिलांची वेळेत पूर्तता केली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून 2020-21 च्या गळीत हंगामात शेतकऱयांनी आपला ऊस मलप्रभा साखर कारखान्याला पाठवला. पण या कारखान्याने केवळ दि. 7 डेसेंबरपर्यंत आलेल्या उसाचे टनाला 2300 रु. प्रमाणे बिल दिले आहे. पण यानंतर मात्र आलेल्या उसाचे बिल अद्याप दिलेले नाही. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपून एक महिन्याचा कालावधी लोटला. तरीदेखील कारखान्याकडून ऊस बिल देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तसेच बऱयाच शेतकऱयांनी खानापूरच्या लैला शुगर्सलाही बराच ऊस पाठवल्याने यावर्षी सदर कारखान्याने 3 लाख टन उसाचे गाळप केले आहे. पण याही कारखान्याने केवळ दि. 7 डिसेंबरपर्यंत आलेल्या उसाचे बिल दिले असून त्यानंतरच्या उसाचे बिल दिलेले नाही. दोन्ही साखर कारखान्यांकडून ऊस बिल न मिळाल्याने ऊस उत्पादक शेतकरी मोठय़ा आर्थिक संकटात सापडले आहेत. एक तर उसाची वाढ होण्यासाठी उसाला खत घालणे गरजेचे आहे. पण ऊस बिलाअभावी खत खरेदी करणे कठीण बनले आहे. खत विक्रेते उधारी खत देण्यास तयार नाहीत. त्यातच मार्च अखेर असल्याने बँका सोसायटय़ांनीही कर्ज भरण्याचा तगादा लावला आहे. ऊस बिल न मिळाल्याने बँका सोसायटींचे कर्ज भरणेदेखील अवघड झाले आहे. दोन्ही साखर कारखान्यांनी याची गांभीर्याने दाखल घेऊन पंधरा दिवसाच्या आत ऊस बिलाची पूर्तता करावी, अन्यथा दोन्ही साखर कारखान्यांवर धडक मोर्चा काढून आंदोलन हाती घेऊ, असा इशाराही गुरुलिंगय्या पुजार यांनी दिला आहे. यावेळी तालुक्यातील रयत संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.