अध्याय सोळावा
सर्वसामान्य लोकांना भजता येतील अशा सहज नजरेला पडणाऱया तुमच्या विभूती सांगा अशी विनंती उद्धवाने केल्यावर भगवंत म्हणाले, भारतीय युद्धाच्या आधी स्वकीयांशी लढावे लागेल या कल्पनेने निराश होऊन अर्जुन युद्ध सोडायला निघाला होता. तेव्हा मी त्याला म्हणालो, या सर्वांना जर तूच निर्माण केलेले असतेस तर तुझ्याने ते मारले गेले असे म्हणता येईल पण तसा प्रकार नाही. याकरिता मी यांना मारणार असे म्हणण्यात तू अभिमानात गुरफटल्याचे मात्र दिसून येते.
देहाचा जो निर्माणकर्ता असतो, तोच त्याचा संहार करणारा असतो. ही अहंता तूं जर सोडली नाहीस, तर मात्र तू दोषी होशील. आता जर तू स्वधर्म विचारशील, तर क्षात्रधर्माप्रमाणे युद्ध म्हणजे एक तीर्थच आहे. म्हणून समरांगणात मृत्यु पावतो तो नित्यमुक्तच होतो. जो निखालस निरभिमानी असतो, तोच समरांगणामध्ये खरा शूर होय. अर्जुना ! तू अभिमान सोडलास तर माझ्याच बरोबरीला पोचशील आणि मग कोणत्याही पातकाची वार्तासुद्धा तुला मुळीच स्पर्श करणार नाही. आता ती अहंता जाईल कशी ? तेही सविस्तर सांगतो.
निश्चयकरून जो माझ्यावरच लक्ष ठेवून स्वधर्मकर्माचे आचरण करेल, त्याच्या चित्ताची शुद्धी होते आणि ज्याच्या चित्ताला शुद्धता प्राप्त होते तो माझ्या भक्तिमार्गाला लागतो. भजनाच्या योगाने माझ्या भक्तांना, तत्काळ माझ्याशी समरस होता येते. ह्याकरिता करणे आणि न करणे हे दोन्ही प्रकृतीच्या माथ्यावर ठेवून तू कायावाचामनेकरून मला शरण ये. खरोखर अशा रीतीने तू सदबुद्धीने मला शरण येशील तर कोणत्याही कर्माची वार्ता मी तुला मुळीच शिवू देणार नाही.
ह्याकरितां हे अर्जुना! मरणारे आणि मारणारे या दोन्ही भावना सोडून समरांगणात शुरासारखे युद्ध कर, म्हणजे मी तुझा उद्धार करीन. अर्जुना ! शरण येणे म्हणजे स्वतःचं अस्तित्व विसरून माझ्यात मिसळून जाणे. असं झालं की, कर्म करणारा व उद्धार करणारा, असा भेदभाव रहात नाही. मला शरण यायचं आणि स्वतःला माझ्यापेक्षा वेगळं समजायचं म्हणजे गुळांत असलेल्या दगडाप्रमाणे समजावं. ते काही अनन्यभावाने शरण येणे नव्हे. नदी समुद्राला शरण गेली, म्हणजे ती समुद्रच होऊन राहते. ती मग परत फिरावयाचे विसरून जाते. कारण ती समुद्राशीच एकरूप होत असते. त्याप्रमाणे अंतर्बाह्य आत्मस्वरूपाशी तद्रूप होऊन माझा भक्त मला रात्रंदिवस सतत शरण आलेला असतो. अर्जुना ! मला जो शरण येतो, तोही मत्स्वरूप होऊन जातो. आता मुक्ताचे लक्षण ऐक. हे जे प्राणिमात्राचे आकार दिसतात ना, ते सर्व माझेच आहेत, असे खरोखर जो श्रद्धापूर्वक पाहतो, त्यालाच ब्रह्मस्वरूपाचे साम्राज्य प्राप्त होते. माझ्या आत्मस्वरूपामध्ये संसार ही मुळी मुख्य भ्रांती आहे. तेव्हा मी मारणारा व हे मरणारे ही गोष्ट कोण मान्य करणार ?
मृगजळ जेथे नसते, तेथे तर कोरडे असतेच पण त्या मृगजळाचा जेथे भास होतो, तेथे तरी काही ओलावा असतो काय ? तद्वत् संसाराला रूप-नाव कल्पीतात तेथे वस्तुतः त्या रूप-नावाचा अभाव असून शुद्ध ब्रह्मच असते, असाच ज्याचा दृढभाव असतो, तो देहात वागत असला तरी ते चालते बोलते ब्रह्मच होय. देहाला जडत्वामुळे कर्म कधी बाधत नाही आणि आत्मा धर्माधर्मांना कधी शिवत नाही. हे वर्म ज्याला कळले, तो देहात वागत असला तरी ते चालते ब्रह्मच होय. तो देहामध्ये वागत असताही विदेहीच होय. विदेह हाच त्याचा देह होय. हे माझे अत्यंत गुह्य ज्ञान मी अर्जुनाला सांगितले.
अशाप्रकारे मी अनेक प्रकारच्या अनेक युक्तिप्रयुक्तींनी त्या युद्धामध्ये अर्जुनाला बोध केला. तेव्हा त्यानेही मला विनंती करून तुझ्याप्रमाणेच माझ्या विभूती विचारल्या होत्या. त्या वेळी अर्जुनाला मी ज्या सांगितल्या, त्याच मी तुला सांगेन. अशा प्रकारे उद्धवाला आश्वासन देऊन भगवंत उद्धवाला त्यांच्या विभूती सांगू लागले. ते म्हणाले, उद्ध्वा ! तू ज्या विभूती विचारल्यास, त्या माझ्या मलासुद्धा मोजता येत नाहीत.
क्रमशः