ऑनलाईन टीम
मोदी सरकारने देशातील क्रीडा क्षेत्राचा सर्वोच्च पुरस्कार असलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली. या पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उडवली आहे.
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावरून खोचक टीका केली आहे. तसेच, यालाच इंग्रजीमध्ये Meglomania असं म्हणतात, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. सिंह यांनी मोदींच्या या घोषणेवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. “आधी अहमदाबादच्या सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम केलं. मला आश्चर्य वाटलं, जेव्हा त्यांनी मेजर ध्यानचंद जीच्या नावे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव ठेवलं”, असं दिग्विजय सिंह यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
यावेळी त्यांनी मोदींना खोचक टोला लगावत “मला तर वाटलं होतं की ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव देखील बदलून नरेंद्र मोदी खेलरत्न पुरस्कार ठेवतील. यालाच इंग्रजीमध्ये Megalomania म्हणतात!” असं देखील म्हटलं आहे.
तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्याची विनंती देशभरातून येत होती. नागरिकांच्या या विनंतीनंतर हे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याची सांगितले आहे.