मुंबई / प्रतिनिधी
खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे समर्थकांनी धडाधड राजीनामे दिले. त्यामुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांनतर त्या दिल्लीला गेल्या आणि दिल्लीहून परत आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आज या नाराज समर्थकांची वरळी येथील निवासस्थानी संवाद साधून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांची समजूत काढताना त्यांनी कोणतंही पद मिळवण्यासाठी राजकारणात आले नसून लोकांची कामे करण्यासाठी राजकारणात आले असल्याचे त्यांनी यावेळी म्हणाल्या. मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मला कुणालाही राजकारण संपवून राजकारण करायचं नाही, असं सांगतानाच मी तुमच्या सर्वांचे राजीनामे फेटाळून लावत आहे, असं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं.
पंकजा मुंडे यांनी आज वरळीत पक्षव कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करतानाच दिल्लीत नेमकं काय घडलं याचीही माहिती दिली. मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मी असुरक्षित नाही. मला कुणालाही संपवून राजकारण करायचं नाही. त्यामुळे मी तुमच्या सर्वांचे राजीनामे नामंजूर करत आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
यावेळी पंकजा मुंडे यांनी दबावतंत्र करत नसल्याचं स्पष्ट केलं. मला दबाव तंत्र करायचं असेल तर ही ती जागा नाही. ही जागा पुरणार नाही. त्यासाठी वेगळी जागा लागेल, असं पंकजा म्हणाल्या. काल मी दिल्लीत गेले होते. पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा झाली. तुम्ही कार्यकर्त्यांना समजवाल हे त्यांनी सांगितलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला झापल्याच्या बातम्या आल्या. मी फटकार खावून तुमच्यापुढे आली असेल असं वाटतं का?, असा सवालही त्यांनी केला.