ऑनलाईन टीम / मुंबई :
ईडीच्या कारवाईला विरोध करणारी नवाब मलिक यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मलिकांवर ईडीने केलेली कारवाई योग्य असून, मलिकांसमोर रितसर जामीनासाठी अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
ईडीकडून आपल्याला बेकायदेशीरपणे अटक करण्यात आल्याचा दावा मलिक यांनी याचिकेतून केला होता. संबंधित प्रकरणात मलिकांना चौकशीसाठी बोलावून त्यांच्याकडून माहिती घेता येऊ शकते. मात्र, तरीही मलिकांना कोठडी देण्यात आली, असं या याचिकेतून मलिकांच्या वकिलांनी म्हटलं होतं. मात्र, नवाब मलिकांचे सर्व आरोप फेटाळून लावत त्यांना दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. मात्र, मलिक यांना रितसर जामीन अर्ज करण्याचा पर्याय खुला असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे मलिक यांना आता जामीन मिळतोय का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या हस्तकांकडून मालमत्ता खरेदी केल्याच्या प्रकरणात मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 7 मार्चला झालेल्या सुनावणीत न्यायालयानं मलिक यांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.