आफ्रिकेतील चिमुकल्यांसाठी ठरणार वरदान
चाचण्यांनुसार…
- ‘आरटीएस,एस/एएस01’ लस पूर्णपणे सुरक्षित
- 30 टक्के गंभीर प्रकरणात वाचविण्याची क्षमता
- एकूण 10 प्रकरणांपैकी 4 लसीद्वारे रोखता येतात
- रुग्णांवर कोणतेही साईड इफेक्ट दिसत नाहीत
जिनिव्हा / वृत्तसंस्था
आरटीएस,एस/एएस01 (RTS,S/AS01) या जगातील पहिल्या मलेरिया लसीला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मान्यता दिली आहे. या लसीच्या माध्यमातून लसीकरणाची सुरुवात मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या आफ्रिकन देशांपासून होणार असल्याची घोषणा डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस घेब्रेसेस यांनी केली आहे. डासांमुळे होणाऱया आजाराविरुद्धची ही पहिली लस असणार आहे. ही लस लहान मुलांसाठी असणार आहे.
मलेरियावरील ‘आरटीएस,एस/एएस01’ नामक लसीमुळे अप्रगत आणि गरीब देशांना मोठा आधार मिळणार आहे. मलेरिया लसीच्या सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये चांगले आणि सुरक्षित परिणाम दिसून आले आहेत. आता या लसीला मान्यता मिळाल्यामुळे मलेरियापासूनचा भविष्यातील धोका टळण्यात मदत होणार आहे. तसेच मलेरियामुळे बालकांच्या मृत्यूदरातही घट होणार आहे.
आफ्रिकेसह जगभरात वर्षाला जवळपास 400000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू हा मलेरियामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. सहारन आफ्रिकेत मलेरियाचा मृत्यूदर सर्वाधिक आहे. या आजारामुळे तरुण मुलांचा सर्वाधिक बळी गेला आहे. आफ्रिकेतील घाना, केनिया आणि मलावीमध्ये 2019 पासून पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून लहान मुलांना मलेरिया लसीचे डोस देण्यात आले. या मोहिमेत लसीचे दोन दशलक्षाहून अधिक डोस देण्यात आले होते. याचा चांगला प्रभाव लक्षात घेतल्यानंतर मलेरियाच्या लसीला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. जीएसके कंपनीने ही लस प्रथम 1987 मध्ये बनवली होती.
निधी उभारण्यासाठी ‘डब्ल्यूएचओ’चे प्रयत्न
‘आरटीएस,एस/एएस01’ ही लस प्रत्येक गरजू देशापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘डब्ल्यूएचओ’ प्रयत्नशील आहे. त्याच पार्श्वभूमीवर मलेरियाची लस बनवण्याच्या निधीच्या व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. योग्य प्रमाणातील लसनिर्मिती प्रक्रियेनंतर संबंधित देश मलेरिया नियंत्रित करण्याच्या उपायांमध्ये लसीचा समावेश करायचा की नाही हे ठरवतील, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. या लसीमुळे मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित देशांसाठी मोठा आशेचा किरण निर्माण झाला आहे.
भारतात दरवर्षी साधारण 3 लाखांहून अधिक रुग्ण
पाच वर्षांखालील मुलांना मलेरियाचा सर्वाधिक धोका असतो. दर दोन मिनिटांनी मलेरियामुळे एका मुलाचा मृत्यू होतो. 2019 मध्ये जगभरात मलेरियामुळे 4.09 लाख मृत्यू झाले, त्यापैकी 67 टक्के म्हणजेच 2.74 लाख जण 5 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. भारतात 2019 मध्ये मलेरियाची 3 लाख 38 हजार 494 प्रकरणे होती आणि 77 लोकांचा मृत्यू झाला. गेल्या पाच वर्षात भारतात 2015 मध्ये मलेरियामुळे सर्वाधिक 384 मृत्यू झाले. त्यानंतर मृतांची संख्या सातत्याने कमी होत आहे.