वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑलिम्पिक पात्रता मिळविण्यासाठी राहिलेल्या शेवटच्या दोन स्पर्धांपैकी एक असलेली मलेशियन ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धा मलेशियात कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑलिम्पिक पात्रता मिळविण्याच्या सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत यांच्या आशेला मोठा धक्का बसला आहे.
25 ते 30 मे या कालावधीत ही स्पर्धा कौलालंपूर येथे घेण्यात येणार होती. ‘सहभागी सर्व खेळाडूंसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी स्पर्धा आयोजक व बीडब्ल्यूएफ यांनी पुरेपूर प्रयत्न केले. पण अलीकडे कोरोना बाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याने स्पर्धा लांबणीवर टाकण्याशिवाय दुसरा पर्याय आमच्यासमोर राहिला नाही,’ असे बीडब्ल्यूएफने सांगितले. ‘ही स्पर्धा पुढे भरविण्यात येणार आहे, मात्र ती ऑलिम्पिकसाठी पात्रता स्पर्धा असणार नाही, हे आम्ही आताच स्पष्ट करतो. स्पर्धेची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येईल,’ असेही बीडब्ल्यूएफने स्पष्ट केले.
या निर्णयाचा सर्वात मोठा फटका भारताच्या ऑलिम्पिक कांस्यविजेत्या सायना नेहवाल व स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत यांना बसला आहे. ऑलिम्पिक पात्रता मिळविण्यासाठी त्यांना ही शेवटची स्पर्धा होती. कोरोना महामारीमुळे इंडिया ओपन (11-16 मे) स्पर्धा लांबणीवर टाकल्यामुळे कौलालंपूर व नंतर होणाऱया सिंगापूर ओपन (1-6 जून) स्पर्धेवर त्यांच्या पात्रता मिळविण्याच्या आशा टिकल्या होत्या. सिंगापूरमध्येही सर्व खेळाडूंना 21 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण करावे लागणार आहे.
मलेशियानेही भारतातून होणाऱया हवाई वाहतुकीवर बंदी घातली असून तेथे पोहोचण्यासाठी बीएआय वेगळय़ा म्हणजे दोहा किंवा लंकामार्गे जाण्याचा पर्याय शोधत आहे. पण आता मलेशियन स्पर्धा लांबणीवर टाकल्यामुळे सिंगापूर स्पर्धेसाठी ते प्रयत्न करणार आहेत. मात्र सायना, श्रीकांतला सिंगापूरला जाता येण्याची शक्यता कमीच आहे. कारण त्यांनीही भारतातून हवाई प्रवासावर बंदी घातली आहे. तेथील दिशानिर्देशानुसार भारतीयांना सिंगापूरमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात येईल, मात्र त्यांना भारत वगळता अन्य कोणत्याही देशात 14 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण करणे आवश्यक आहे. सायना, श्रीकांतप्रमाणे महिला दुहेरीची जोडी एन.सिक्की रेड्डी व अश्विनी पोनप्पा यांचीही संधी हुकली आहे.