मलेशियातील पामतेलाची आयात बंद : खाद्यतेल महागले
चेन्नई
भारत आणि मलेशियात सुरू असलेल्या वादाचा फटका आता दक्षिण भारतात लोकप्रिय खाद्यपदार्थ डोसा आणि इडलीला बसत आहे. पामतेलावरील आयात शुल्क वाढविण्यात आल्याने सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलाच्या किमती वाढल्याचे रेस्टॉरंट आणि हॉटेलमालकांनी म्हटले आहे. कॉफी, इडली, वडा आणि डोसाच्या किमती न वाढविण्यात आल्यास व्यवसाय चालविणे अवघड होणार असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी म्हटले आहे.
मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी काश्मीरसंबंधी आक्षेपार्ह विधान केल्यावर भारताने पामतेलाची आयात रोखल्याने खाद्यतेलांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. हॉटेल व्यावसायिकांना पामतेल आयातबंदीची झळ बसू लागली आहे. कॉफीच्या दरात 2, इडली-वडय़ाच्या किमतीत 5 रुपये आणि डोसा दरात 10 रुपयांची वाढ करण्याची योजना असल्याचे हॉटेलमालकांच्या संघटनेने म्हटले आहे. किंमत वाढल्यास ग्राहक दुरावण्याची भीती रेस्टॉरंटचालकांना सतावत आहे. या पार्श्वभूमीवर स्वतःचा खर्च कमी करण्याचे पाऊल रेस्टॉरंटचालकांनी उचलले आहे.
मलेशियाचे नेतृत्व नरमले
काश्मीर आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यावर पाकिस्तानच्या भूमिकेचा पुनरुच्चार करणाऱया मलेशियाचे नेतृत्व वठणीवर येऊ लागले आहे. भारताने मागील महिन्यात मलेशियातून रिफाईंड पामतेलाच्या आयातीवर बंदी घातली होती. भारताच्या निर्णयानंतर मलेशियाचे सूर बदलू लागले आहेत. पंतप्रधान महातिर यांचे उत्तराधिकारी अन्वर इब्राहिम यांनी भारताने बदललेला सूर लक्षात घ्यावा असे गुरुवारीच म्हटले आहे.