मैदानी कुस्तीमुळे पोटापाण्याची समस्या सुटते हे खरे आहे. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर जायचे असेल तर पैलवानांनी गादीचीच कास धरली पाहिजे. व्यायामातील सातत्य, गुरूबद्दल निष्ठा आणि परिश्रम करण्याची तयारी या गोष्टी असतील तरच कुस्तीत यश प्राप्त होते. कष्ट न करता केवळ प्रशिक्षक बदलून निर्णय मिळणार नाही. मल्लांनी कुस्तीकडे बघण्याची दृष्टीकोन बदलला पाहिजे. पालक आणि प्रशिक्षकांनी देखील मल्लांना आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याचे स्वप्न दाखवले पाहिजे, असे अर्जुनवीर काकासाहेब पवार यांनी सांगितले.
काकासाहेब पवार म्हणाले, आज कुस्तीला चांगले दिवस आहेत.ज्यांच्या अंगी गुणवत्ता आहे, अशा मल्लांना लोकाश्रय आणि प्रायोजक देखील मिळत राहतात. पैलवान गरीब घरातूनच पुढे येत असतात. चांगली कामगिरी करणाऱया मल्लांना कुस्तीमुळेच चांगले दिवस आले आहेत. आज अनेक प्रशिक्षक मल्लांना मातीतील कुस्तीत अडकून ठेवत आहेत. मैदानी कुस्तीत केवळ एक दिवसापुरते टाळय़ा वाजवून पोट भरणार नाही. करिअर करायचे असेल तर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या मल्लांना रेल्वेने नोकरी देऊन त्यांच्या पोटापाण्याची समस्या मिटवली आहे. आज राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पुण्याच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील मल्लांच्या उत्तम कामगिरी होत आहेत. कारण या प्रशिक्षण केंद्रात मल्लांनी केलेल्या कष्टामुळे त्याचे निकाल मैदानात दिसून येत आहेत. शासनाच्या धोरणावर आणि सोयी सुविधांवर अवलंबून न राहता कुस्ती केंद्रांनी आंतरराष्ट्रीय पातळी प्रमाणेच पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. उत्तर भारतातील हरियाणा, दिल्लीसारख्या छोटय़ा छोटय़ा राज्यातील पालक मुलांना कुस्तीत सोडताना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याचे स्वप्न दाखवतात. चांगल्या सोयी सुविधा असणाऱ्या कुस्ती प्रशिक्षण केंद्रात मुलांना पाठवून त्यांना प्रेरणा देतात. त्यामुळेच आज उत्तर भारतातील मल्ल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. एशिया चॅम्पियन स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या 30 पैकी 28 पैलवान एकटय़ा हरियाना राज्यातील आहेत. महाराष्ट्रातील एकही पैलवान या संघात नाही, हे दुर्देव आहे. केवळ प्रशिक्षकावर अवलंबून न राहता पालकांनी देखील मुलांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मैदानी कुस्तीत अडकून पडल्यामुळेच महाराष्ट्र आणि पंजाबसारख्या मोठय़ा राज्यातील कुस्तीची राष्ट्रीय स्तरावर पिछेहाट होत आहे. त्यामुळे राज्यातील मल्लांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याचे ध्येय बाळगणे गरजेचे आहे.