काँग्रेसकडून राज्यसभा अध्यक्षांना पत्र सादर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ 15 फेब्रुवारीला संपत असल्यामुळे ते निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी आता विरोधी पक्षनेते म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसने यासंबंधी राज्यसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. आझाद यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्याजागी मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती करावी, यासाठी काँग्रेसने राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे.
जम्मू-काश्मीरमधून गुलाम नबी आझाद यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाली होती. जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यापासून या राज्याला विधानसभा नाही. खर्गे कर्नाटकातून राज्यसभेवर आलेले आहेत. 2014 ते 2019 दरम्यान ते लोकसभेत काँग्रेसचे नेते होते. आवश्यक संख्याबळ नसल्यामुळे सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला मागच्या आणि विद्यमान लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळालेले नाही.
खासदार गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ येत्या 15 फेब्रुवारीला संपत आहे. तीन दिवसांपूर्वी राज्यसभेत त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पाडला. यावेळी वेगवेगळय़ा पक्षातील नेत्यांनी आझाद यांच्या गुणांचे कौतुक केले. गुलाम नबी आझाद यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदीही भावूक झाले होते. एकूणच आझाद यांना निरोप देताना सभागृह भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते.