काही भाग तोडून बांधकाम, महामार्ग प्रशासन सुस्त
वार्ताहर / सावंतवाडी:
मुंबई-गोवा महामार्गावर मळगाव भागात खुलेआम अतिक्रमण करण्यात आले आहे. घाटमार्ग काही भागात खचून धोकादायक बनला आहे. तर काही ठिकाणी अतिक्रमण केले जात आहे. मळगाव महामार्गालगत रस्त्याचा काही भाग तोडून अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे या बांधकामाला कुणाचा वरदहस्त आहे? बांधकाम कुणाच्या परवानगीने केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर मळगाव ब्राहृमणआळी, सुतारवाडी, रेडकरवाडीकडे व सावंतवाडीकडे येणाऱया मार्गालगत अनधिकृतपणे हायवे तोडूनच बेकायदा बांधकाम करून गाळे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे हायवेवरून ये-जा करताना अडचणीचे ठरत आहे. भविष्यात स्थानिक रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. बांधकाम करताना ग्रामपंचायतीची परवानगी घेतली का? तसेच महामार्ग प्रशासनाची परवानगी आहे का? जर परवानगी असेल तर हायवेला लागून बांधकाम करता येते का, असा सवाल उपस्थित होत आहे. तसे असेल तर सर्वसामान्य जमीनधारकांनाही परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. रस्त्याचा काही भाग तोडला गेला असताना संबंधित विभाग गप्प का, असा सवाल व्यक्त होत आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडे संपर्क साधला असता या प्रकरणी चौकशी केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.