प्रतिनिधी/ काणकोण
काणकोण तालुक्यातींल शेतकऱयांनी कोरोना महामारीच्या धोक्याचा सामना करूनदेखील पिकावर आलेल्या भातशेतीची कापणी केली. मात्र मळणीचे यंत्र उपलब्ध न झाल्यामुळे मळणीचे काम होत नसल्याबद्दल शेतकऱयांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कृषी खात्याने लगेच मळणीचे यंत्र उपलब्ध केल्याबद्दल येथील शेतकऱयांनी समाधान व्यक्त केले आहे. यासंबधीचे वृत्त तरुण भारतने प्रसिद्ध केले होते.
या तालुक्यात पैंगीण, चिपळे, पोळे, देवाबाग या भागांमध्ये वायंगणी शेती केली जाते. ऐन पिकावर भातशेती आल्यानंतर ‘कोरोना’ महामारीमुळे अडचण निर्माण झाली होती. शेतकऱयांनी भातशेतीची कापणी केली, तरी मळणीचा सोपस्कार अडून पडला होता. यासंबंधीचे गाऱहाणे काणकोणचे विभागीय कृषी अधिकारी शिवराम ना. गावकर यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी कृषीमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्याशी संपर्क साधून त्यावर उपाय शोधून काढला आणि शेतकऱयांना मळणी यंत्र उपलब्ध करून दिले. यंत्र जरी याठिकाणी असले, तरी ऑपरेटर शेजारच्या कर्नाटक राज्यातून आणावा लागला. या सर्व गोष्टींवर मात करून शेतकऱयांना मळणीचे यंत्र उपलब्ध करून दिल्यानंतर मळणीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला असून येणाऱया चार-पाच दिवसांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता शेतकऱयांनी व्यक्त केली आहे.