तीन दिवसीय शिबिरात 45 मुलांचा सहभाग : श्री वनदेवी-मुकोबा मंदिरापर्यंत दिंडीचा आविष्कार
प्रतिनिधी /पणजी
मळार-ओल्ड गोवा येथील मंगलश्री ध्यान केंद्र आणि गोम्ंातक संत मंडळ, फोंडा यांनी मळार येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय बालकीर्तनकार प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन नुकतेच झाले. या शिबिरात मळार, ओल्ड गोवा, खोर्ली, करमळी परिसरातील 45 मुले, मुली शिबिरार्थी सहभागी झाले असून गोव्यातील प्रसिद्ध कीर्तनकार सुहासबुवा वझे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर चालणार आहे.
शिबिराच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी ओल्ड गोव्याचे समाजसेवक तथा माजी सरपंच, विद्यमान पंच नीळकंठ भोमकर होते. बालकीर्तनकार सना साटेलकर, मनस्वी नाईक, आकांक्षा प्रभू, सर्वेश साळगावकर, प्रभुत्वा भगत यांनी कीर्तनाच्या सुंदर नमनाने सोहळय़ास प्रारंभ केला आणि सारे वातावरण चैतन्यमय होऊन गेले. त्यानंतर समईप्रज्वलन आणि नामघोषाने उद्घाटन करण्यात आले.
हिंदुंना स्वसंस्कृती, स्वधर्मशिक्षणाची गरज : वझे
सुहासबुवा वझे यांनी आपल्या भाषणात सांगितले की हिंदुंना सणउत्सवांची धर्मशास्त्रीय माहिती नसल्याने, देवपुजेचे ज्ञान नसल्याने प्रत्येकाचे फार मोठे नुकसान होत आहे. काहीजण केवळ पैशांसाठी सर्वकाही करत आहेत. आपल्या मुलांचे भवितव्य चांगले व्हायचे असेल तर त्यांना संस्कृती, धर्मशिक्षण द्या, असे आवाहन केले.
कीर्तनाने जीवन चैतन्यमय होते : नाईक
प्रमुख वक्ते म्हणून दै. तरुण भारतचे संपादकीय विभाग प्रमुख राजू भिकारो नाईक यांनी आपल्या भाषणत सांगितले की कीर्तन करणाऱयाला आणि ते श्रवण करणाऱयालाही चैतन्याची अनभुती मिळते. आपले जीवन चैतन्यमय होऊन जाते. देव, देश अन् धर्माचे तसेच सामाजिक समस्यांचे जागरण होते. आपल्या सांस्कृतिक परंपरेच्या लौकिकात भर पडते, असे सांगून कीर्तनाची ही गुढी या लहान मुलांनी आपल्या खांद्यावर घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. या मुलांमुळे आपल्या वैभवशाली संस्कृतीचे संवर्धन होईल, असा विश्वासही व्यक्त केला.
विशेष अतिथी डॉ. राजेश किनरे यांनी कीर्तनातून संस्कृती रक्षणाचे काम आयोजक संस्थांनी केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. कीर्तन हे आपल्या राष्ट्रीय संस्कृती प्रभावी अंग असल्याचेही नमूद केले. करमळीचे माजी सरपंच राजेश नाईक यांनी आपल्या बालपणी कीर्तनाबद्दल जी आस्था निर्माण केली ती आजही असल्याचे सांगितले. शिक्षिका सौ. सुरेखा गावस यांनी ध्यानधारणेमुळे मिळणारे मानसिक व शारीरिक अनुभूतीसंदर्भात मार्गदर्शन केले
वृत्तपत्राच्या अनास्थेबद्दल खंत आणि निषेधही : गोलतकर
समाजसेवक गजानन गोलतकर यावेळी म्हणाले की काही वृत्तपत्रे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या बातम्यांना पुरेसे स्थान देत नाहीत. या परिसरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात, पण त्यांना प्रसिद्धी मिळत नाही. दोन दिवस विनंती करुनही एका वृत्तपत्राने (तरुण भारत नव्हे) या शिबिराची बातमी दिली नाही. वृत्तपत्रांच्या या अनास्थेबद्दलची खंत आपण जाहीरपणे मांडतो आणि निषेधही करतो, असेही ते म्हणाले.
संस्कृती टिकली तरच हिंदू टिकणार : भोमकर
अध्यक्षस्थानावरुन बोलताना नीळकंठ भोमकर यांनी या शिबिराच्या आयोजनाबद्दल सागर भट, सुशांत बोरकर व सहकाऱयांचे अभिनंदन केले. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सढळ हस्ते मदत करण्यास आपण कधीच मागेपुढे पाहिले नाही, कारण ही संस्कृती टिकली, तरच आपली भावी पिढी सुरक्षित राहणार आहे, याची जाण आपण ठेवली आहे.
सुरुवातीस मंगलश्री ध्यान केंद्राचे अध्यक्ष सागर भट यांनी मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सुशांत बोरकर यांनी ऋणनिर्देष केला. शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.