भाजपचे राज्यपालांना पत्र ः राजकीय पटलावर पुन्हा वादळ
प्रतिनिधी/ मुंबई
राज्याच्या मविआ सरकारमधील शिवसेनेचे 39 सदस्य आमदार बाहेर असल्याचे समजते. त्यामुळे राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला असता सरकार अल्पमतामध्ये आल्यासारखे वाटते. म्हणून या सरकारने आपले बहुमत विधीमंडळात सिद्ध करावे, अशी मागणी करणारे पत्र भाजपने ई-मेलद्वारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले असल्याची माहिती भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आपण राज्यपालांची भेट घेतली असून प्रत्यक्षही पत्र दिले असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचे विविध आदेश, निर्णय पडताळून राज्यपाल याबाबत योग्य ते निर्देश मविआ सरकारला देतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर मात्र महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय वादळ निर्माण झाले आहे. तर या दरम्यान पडद्याआड राहून वावरणाऱया भाजपने प्रथमच उघडपणे आपले मत मांडले आहे.
वेट अँण्ड वॉचनंतर मैदानात
दरम्यान, याआधी भाजपने शिवसेनेतील बंडखोरी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगून जाहीर भूमिका घेणे टाळले होते. परंतु भाजपच्या पडद्यामागे फडणवीस यांच्या हालचाली सुरु होत्या. तब्बल तीन ते चार वेळा दिल्लीला जाऊन आले होते. शिंदे यांनी बंड केले त्या दिवशी आणि त्यानंतरही दोनवेळा फडणवीस दिल्लीला जाऊन आले होते. मंगळवारीही त्यांनी सकाळी दिल्ली गाठली होती. तेथून फडणवीस मुंबईत आल्यावर त्यांनी तातडीने राजभवन गाठले. भाजपच्या या वेगवान हालचालींमुळे राज्यात सत्ता स्थापनेबाबत फडणवीस यांना ग्रीन सिग्नल दिला गेला असल्याचे मानले जात असून हे सत्तानाटय़ लवकरच संपुष्टात येण्याचीही शक्यता आहे.
दिल्लीतून आल्याआल्याफडणवीसांनी घेतली बैठक
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सुरु असलेल्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याही दिल्ली वाऱया वाढल्या आहेत. गेल्या सात दिवसांमध्ये ते पाचवेळा दिल्लीला गेले होते. मंगळवारीही सकाळी ते दिल्लीला गेल्याचे वृत्त पुढे आले होते. सायंकाळी मुंबईला परतल्यावर त्यांनी तातडीने राज्यातील भाजप पदाधिकारी, सदस्यांची तातडीने बैठक घेतली. या बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा झाल्याचे तसेच दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर चर्चा झाल्याची सर्व माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर भाजपची ही बैठक पार पडताच फडणवीस यांच्यासह वरिष्ठ नेते थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीस गेले. सुमारे अर्धातास त्यांची राज्यपालांशी चर्चा झाली.
राज्यपालांकडून अपेक्षा
या बैठकीनंतर राजभवनाबाहेर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी राज्यात सद्यस्थितीबाबत चर्चा केली आहे. विविध माध्यमांतून राज्यातील मविआ सरकारमधील शिवसेनेचे बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक 39हून अधिक आमदार राज्याबाहेर गुवाहाटीमध्ये असल्याचे समजते. या सर्वांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोध असल्याचेही वृत्तांवरुन समजते. त्यामुळे अशा परिस्थितीत सरकार अल्पमतांमध्ये आले असावे, असे आम्हाला वाटते. म्हणून राज्यपालांनी या सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी विनंती करणारे पत्र दिले असल्याचेही फडणवीस म्हणाले. याबाबत असलेल्या सर्व कायदेशीर बाबी तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, निकष पाहून राज्यपाल महोदय मविआ सरकारला बहुमत सिद्धतेसाठी योग्य ती कारवाई करण्याबाबत निर्देश देतील, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
आता ठाकरे सरकारची परीक्षा
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फडणवीस यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. तथापि तातडीने त्यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. परंतु त्यांनी हस्तक्षेप करुन मविआ सरकारला बहुमत सिद्ध करण्याबाबत आदेश दिले तर ठाकरे सरकारची विधीमंडळात सत्वपरीक्षा होणार आहे. जर सरकार बहुमत सिद्ध करु शकले नाहीतर राज्यपाल भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावू शकतात. त्यावेळी शिंदे गट भाजपला साथ देऊ शकतो.
अमित शहांच्या फडणवीस यांना सूचना
दरम्यान, तत्पूर्वी मंगळवारी सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. या भेटीमध्ये महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत तसेच संभाव्य सत्ता स्थापनेबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीला राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ विधीज्ञ महेश जेठमलानीही उपस्थित होते. त्यामुळे भाजपकडून सर्व कायदेशीर बाबी पाहूनच पुढील निर्णय घेतला जाणार हेही स्पष्ट झाले होते. राज्यात सरकार स्थापन करण्याची वेळ आलीच तर भेडसावणाऱया सर्व समस्यांवर कायदेशीर दृष्टीकोनातून कथ्याकूट करण्यात आला आहे. अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये साधारणपणे मुख्यमंत्री भाजपचा असेल, मंत्र्यांची एकूण संख्या 28 असेल, खराब प्रतीमा असणाऱयांना मंत्रीमंडळात घेण्यात येणार नाही, अशा स्पष्ट सूचना शहा यांनी केल्या असल्याचे समजते.
माध्यमांवर पत्र व्हायरल
मंगळवारी रात्री उशीरा या घडामोडी घडत असतानाच 30 जून रोजी विशेष अधिवेशन बोलावले जाऊन मविआ सरकारला बहुमत सिद्ध करण्याची मागणी करणारे कथित पत्र भाजपने राज्यपालांना दिल्याचे समाज माध्यमावर व्हायरल झाले. तथापि असे कोणतेही पत्र मिळाला नसल्याचा खुलासा राजभवानातून करण्यात आला. मात्र लगेचच काही मिनिटांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनीच बहुमत सिद्धतेची मागणी केल्याचे सांगितले. आणि हा वाद मिटला.
राज्यपालांच्या निर्णयानंतर शिंदेगट मुंबईत येणार
भाजपने राज्यपालांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडल्यानंतर राज्यपाल आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपची एन्ट्री झाल्यानंतर मात्र राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. इकडे या घडामोडी सुरु असतानाच तिकडे गुवाहाटीमध्ये बंडखोर शिंदे गटानेही तातडीने बैठक घेतल्याचे वृत्त आहे. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याची तारीख आणि वेळ ठरवल्यानंतर त्याचवेळी मुंबईला जाण्याचेही शिंदे गटाच्या बैठकीत ठरल्याचे समजते.
मविआ सरकार कोर्टात जाणार भाजपने विश्वासदर्शक ठरावाची मागणी केल्यानंतर आता मविआ सरकारनेही कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी सुरु केली आहे. याआधी शिंदे गटाच्या सुनावणीवेळीच याबाबत न्यायालयात चर्चा झाली होती. तेव्हाच सर्वोच्च न्यायालयाने हा मुद्दा उपस्थित झाल्यास न्यायालयात येण्याबाबत सांगितले होते. उद्या बुधवारीच मविआ सरकार याबाबत कोर्टात जाण्याची अधिक शक्यता मानली जात आहे.