माघ पौर्णिमा 8 फेब्रुवारी रोजी आहे. या दिवशी भगवान विष्णु गंगेच्या पाण्यात निवास करतात असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी गंगा स्नान केल्यास सर्व पापे धुतली जातात अशी भाविकांची श्रद्धा आहे.
संत रविदास यांच्या जयंती माघ पौर्णिमेला साजरी केली जाते. गोव्यातील मंगेशी मंदिरात रथयात्रा प्रारंभ होते.
माघ पौर्णिमा हा एक बौद्ध सण आहे. बुद्धांनी वैशाली नगरीमध्ये इ.स.पू. 483 ला 45 वा वर्षावास केला होता. तथागतांनी माघ पौर्णिमेलाच आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती. या पौर्णिमेला बुद्ध मुर्तींची मिरवणूक काढली जाते आणि धम्माची शिकवण घेऊन अष्टशीलाचे व्रत केले जाते.
माघ पौर्णिमेला “नव्याची पुनव’’ म्हणतात. नव्याची म्हणजे नवीन धान्याची. भूमीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा शेतीशी संबंधित असाच सण आहे.पश्चिम महाराष्ट्रात शेतात पिकलेल्या नवीन धान्याची मुठीच्या आकाराची पेंडी एक किंवा दोन आणतात. त्या घराच्या दाराजवळ बांधतात. मग मातीच्या पाच चपटय़ा मूर्ती तयार करून उंबऱयाजवळ सारवलेल्या जमिनीवर त्या ठेवतात. अंगणात नवीन धान्याचा नैवेद्य शिजविला जातो. या मूर्तींना आणि ग्रामदेवतेला नैवेद्य दाखवितात. ज्वारीची पाच ताटे आणतात. त्यांच्या टोकाला गाठ मारतात. गव्हाच्या पाच मुठीएवढय़ा पेंढय़ा तेथे ठेवल्या जातात. या ताटात कणकेचे पाच दिवे करून लावतात व त्यांची पूजा करतात. त्याशिवाय नवीन आलेले धान्य खायचे नाही, अशी पद्धत आहे.
काही ठिकाणी धान्याची एक पेंढी रानातच एका मेढीला बांधून ठेवतात. त्या मेढीची पूजा करून तिला धान्याचे पाच दाणे आणि नव्या धान्याचा नैवेद्य दाखवितात. काही शेतकरी धान्याचे खळे करतानाच खळय़ाच्या मध्यभागी पेंढी पूजतात व मगच खळे करण्यास प्रारंभ करतात.