पुणे / प्रतिनिधी :
ज्या महाविद्यालयात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची जडघडण झाली त्या महाविद्यालयात त्यांच्या स्मृती जागविणे हे कौतुकास्पद आहे. प्रत्यक्ष काम करणे आणि संस्थात्मक काम करणे यामधील फरक ओळखून त्यांनी अस्पृश्यता आणि स्त्रियांच्या प्रश्नांवर मोठे कार्य केले. अस्पृश्यतेचे मूळ शोधून त्यावर काम करणारे संशोधक म्हणजे शिंदे होते. मानवतावादी विचारांची पायाभरणी शिंदे यांनी केली. महाराष्ट्रातील खºया अर्थाने आद्य अस्पृश्यता निवारक म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे होते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
द फर्ग्युसोनियन्स या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संस्थेच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाविद्यालयात स्मरण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विषयी व्याख्यानाद्वारे मोरे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे, डी. ई. एस सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. शरद कुंटे, संघटनेचे अध्यक्ष टि.बी. बहिरट, अॅड. विजय सावंत, प्रा. रवींद्र सिंग परदेशी, गणेश चव्हाण, कर्नल तांबे, अॅड. रणजित मोरे, प्रकाश रेणुसे आदी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या पहिल्या तुकडीतील नऊ विद्यार्थ्यांपैकी एक असलेले महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारांचे व कार्याचे यावेळी स्मरण करण्यात आले.
डॉ.सदानंद मोरे म्हणाले, स्वराज्याची चळवळ सुरू असताना विठ्ठल रामजी शिंदे यांनी अठरापगड जातींच्या आणि वेगवेगळ््या जमातीच्या लोकांची बैठक शनिवारवाड्यावर घेतली. तेव्हा वृत्तपत्रांमध्ये शिंदे यांची सर्कस असे मथळे छापून येत होते. या बैठकीत प्रत्येकाने येवून आपल्या समाजाच्यावतीने एक स्वराज्याला पाठिंबा देणार असे सांगितले. त्याकाळी सामाजिक आणि राजकीय कार्यात देखील पुढे असणारी व्यक्ती म्हणजे शिंदे. मुलांना आणि मुलींना मोफत शिक्षण मिळावे यासाठी पुढाकार घेवून पालिकेत जाणारे शिंदे होते. त्यांच्या समाजातील कार्याच्या अनेक उदाहरणांवरून त्यांनी मानवतावादी विचारांची पायाभरणी केलेली दिसून येते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अनेक आठवणींना उजाळाही त्यांनी दिला.