उद्यमबाग येथील उद्योजकांची मागणी : वर्षाला 3 कोटींहून अधिक महसूल होतो जमा : पायाभूत सुविधा नसल्याने उद्योजकांसमोर प्रश्न
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव औद्योगिक क्षेत्र हे फौंड्री उद्योगासाठी ओळखले जाते. देशातील महत्त्वाच्या फौंड्री क्लस्टरमध्ये बेळगावचा समावेश होतो. परंतु औद्योगिक वसाहतींमध्ये पायाभूत सुविधा नसल्याने उद्योग चालवायचे कसे, असा प्रश्न उद्योजकांसमोर आहे. केवळ उद्यमबागमधून वर्षाला 3 कोटी 20 लाखहून अधिक महसूल जमा होतो. त्यातील 50 टक्के रक्कम दरवषी खर्च केल्यास उद्यमबागचा विकास साधता येईल व नवे उद्योग बेळगावमध्ये येतील. त्यामुळे रोजगार निर्मिती वाढवायची असेल तर औद्योगिक क्षेत्राला पायाभूत सुविधा पुरवा, अशी मागणी उद्योजकांमधून केली जात आहे.
बेळगावच्या उद्योगाची सुरुवात उद्यमबाग येथील औद्योगिक वसाहतीपासून झाली. उद्योगांना जागा अपुरी पडू लागल्याने शेजारी असणाऱया मच्छे, वाघवडे, अनगोळ व नावगे या परिसरात औद्योगिक वसाहत पसरली गेली. याचसोबत राष्ट्रीय महामार्गालगत काकती व होनगा येथे केआयएडीबीच्या माध्यमातून औद्योगिक वसाहत वसविण्यात आली. वर्षानुवर्षे उलटली तरी बेळगावच्या औद्योगिक वसाहतींची दुखणी मात्र तीच आहेत. रस्ते, वीज, पाणी, पथदीप, शौचालये या पायाभूत सुविधांविना उद्योगांच्या विकासाला खीळ बसली आहे.
दवाखाना, शौचालयांची गरज
उद्यमबाग व परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये 12 हजारहून अधिक कामगार काम करीत आहेत. कारखान्यांवर आधारित इतर व्यवसायांमध्ये 6 ते 7 हजार कामगार काम करतात. परंतु या परिसरात मोठा दवाखाना नाही. इएसआयचा दवाखाना असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. कामगाराला अपघात झाल्यानंतर ताबडतोब उपचार करण्यासाठी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल या परिसरात असणे गरजेचे आहे. या परिसरात सार्वजनिक शौचालयांचा अभाव आहे. मोठय़ा कारखान्यांमध्ये शौचालये असली तरी एक-दोन कामगार घेऊन काम करणाऱया कारखान्यांमध्ये मात्र शौचालये नसल्याने कामगारांची कुचंबना होत आहे. त्यामुळे सार्वजनिक शौचालय सुरू करण्याची मागणी होत आहे.
रस्त्यांची अवस्था बिकट
उद्यमबाग परिसरात अद्याप अनेक मार्गांवर रस्त्यांची अवस्था बिकट आहे. औद्योगिक वसाहत निर्माण होऊन अनेक वर्षे उलटली तरी अद्याप रस्ते नसल्याने कारखान्यांमध्ये कच्चा माल आणणे व तयार झालेला माल बाहेर पाठविणे यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. गटारींची व्यवस्था नसल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचणी येत आहेत. यामुळेच दोन वर्षांपूर्वी कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी शिरून साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. यामुळे या परिसरात चांगले रस्ते व गटारींची निर्मिती करावी, अशी मागणी उद्योजक करीत आहेत.