उदयनराजेंनी केली भविष्यवाणी
प्रतिनिधी/ सातारा
लोकशाहीमध्ये सगळे समान आहेत. आजपर्यंत प्रत्येकाला माहिती नसेल मंडल आयोग मुद्दा मी मांडला नसता तर माझ्यावर भडीमार केला असता. हा विषय मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा आहे. आणि इथे माझ्यावर आणि छत्रपती संभाजीराजेंवर आरोप केले जात आहेत. बंदूक तुमच्या हातात होती तेव्हा काय केलं? आज आमच्या खांद्यावर बंदूक ठेवता, अशा शब्दात पुन्हा मराठा आरक्षणावरून नाव न घेता शरद पवार यांच्यावर खासदार उदयनराजे यांनी तोफ डागली. तसेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवता कामा नये. मेहरबानी करून फाटे फोडू नका, तेढ निर्माण केली तर महाराष्ट्राचे तुकडे तुकडे निर्माण होतील, अशी भीतीही खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर स्वार्थासाठी बनलेले महाविकास आघाडी सरकार आपोआप कोसळेल, अशी भविष्यवाणीही उदयनराजेंनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, अखिल भारतीय मराठा समाजाचे शशिकांत पवार यांनी शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या हातात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा होता. त्यांनी मंडल आयोगाला पाठींबा दिला अन् मराठा समाजाला डावलले गेल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला.
जलमंदिर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शशिकांत पवार उपस्थित होते. खासदार उदयनराजे म्हणाले, मराठा आरक्षण न मिळण्याला अनेक जबाबदार आहेत. महाराष्ट्र एकत्र ठेवायचा असेल तर सगळ्या जातीना एकत्र केल्याशिवाय पर्याय नाही. आज व्यक्तीकेंद्रीत समाज बनू लागला आहे. मराठा समाजाला वंचित ठेवता कामा नये, मेहरबानी करून फाटे फोडू नका, तेढ निर्माण केली तर महाराष्ट्राचे तुकडे तुकडे निर्माण होतील, अशी भीती व्यक्त करत वैयक्तिक स्वार्थासाठी कोण हे करत असेल तर त्याला बाजूला ठेवा असे सांगत उदयनराजे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभाव ही शिकवण दिली. कधी दुजाभाव केला नाही. पण आपल्याला कोणाचं आरक्षण काढून घ्यायचं नाही, जे हक्काचं आहे तेच समाज मागत असून आम्हाला का वाळीत टाकलं, असा विचारत आहे, असे ही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमध्ये हे तिन्ही पथ फक्त स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. स्वार्थ साध्य झाल्यावर ते आपोआप जातील. त्यामुळेच लवकरच हे सरकार पडेल असेही उदयनराजे म्हणाले.
शरद पवारांनी मंडल आयोगात मराठा समाज घेतला नाही
शशिकांत पवार म्हणाले, उदयनराजे यांना पहिल्यांदा भेटलो बरं वाटलं, संबंध महाराष्ट्रभर लोकांच्या मनात कुतूहल असते. मराठा समाजाचे काम मी 50 वर्षापेक्षा जास्त वर्ष करतो आहे. माझ्या बालपणापासून काम करतो आहे. न्याती समाज, अण्णासाहेब पाटील यांच्या काळापासून काम करतो. त्यावेळी मराठा समाज मर्यादित होता. अण्णासाहेब पाटील आम्ही बाहेर पडलो. त्यावेळी पहिल्यांदा मंडल आयोग आला. मंडल आयोगाने आणखी प्रॉब्लेम आला. मंडल आयोगाचे पुस्तकं वाचल्याने मराठा समाज बाजूला गेला. मराठा समाजाला वसंतदादा पाटील यांनी मदत केली. मात्र, शरद पवार यांनी मंडल आयोगाला पाठींबा दिला. तो काढताना मराठा समाजाला का घेतलं नाही. मराठाच बाजूला केले त्यावर चर्चा करताना दलित समाजातील माणसं म्हणाली विरोध करू नका. मराठा समाजाच्या हक्कासाठी लढलेली एवढी वर्ष माझी फुकट गेली आहेत. ज्या लोकांकडे अपेक्षा होती ते शरद पवार. पण ते बोलत नव्हते. नारायण राणे साहेब महाराष्ट्रात फिरले आहेत, अशी टिप्पणी करत मराठा समाज मोठा आहे. सगळ्यांनी एकत्र येणं अपेक्षित आहे. मराठा समाजास एकत्र आले पाहिजे, असे मत पवार यांनी व्यक्त करत मराठा आरक्षण मिळत नसेल तर आम्ही मेलेलं बर, अशी खंत व्यक्त केली.
खासदार उदयनराजे यांनी एकाच बाण दोन्ही ठिकाणी साधला निशाणा
खासदार उदयनराजे यांनी शशिकांत पवार या जेष्ठ मराठा चळवळीचे कार्यकर्त्यांना आणून मुद्दे कथन करायला लावले. त्यांचे नाव शशिकांत असल्याने आमदार शशिकांत शिंदे आणि पवार हे आडनाव असल्याने शरद पवार यांना असा दोघांच्यावर रोख साधला. दरम्यान, पत्रकारांनी विचारले असता आमदार शशिकांत शिंदे यांना संसदपट्टू त्यांना पुरस्कार मिळाला. ते बोलण्यात पटाईत आहेत. मराठा आरक्षण हा राज्याचा प्रश्न, स्वतः करायचं नाही आणि दुसऱयाच्या नावाने ओरडत बसायचं, अशी टिप्पणी करत, पालिका निवडणुकीत उतरणार असल्याबाबत छेडले असता त्यानी सगळीकडे उतरू दे, कोणी कुठं उभं रहायचं त्यांनी ठरवू द्या, अशा शब्दात फटकारले.