सांगली / प्रतिनिधी
गोरगरिब जनतेला तसेच वंचित घटकाला स्वत:चा निवारा मिळावा यासाठी शासन विविध आवास योजना राबवित आहे. या आवास योजनेचा प्रत्येक पात्र लाभार्थ्याला लाभ मिळावा, त्यांना स्वत:च्या हक्काचे घर मिळावे, यासाठी महाआवास अभियान मोहिम जिल्ह्यात पंचायत समितीच्या माध्यमांतून राबवा असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात महाआवास अभियान (ग्रामीण) अंमलबजावणी आढावा बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडनीस, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, केंद्र व राज्य शासन विविध महाआवास योजनांद्वारे घरकुल देण्यासाठी कालबध्द कार्यक्रम राबवित आहे. याचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी जिल्हास्तरावर मोहिम राबवुन प्रत्येकाला घर उपलब्ध होईल यासाठी काम करावे. तसेच घरासाठी भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठीही प्रयत्न करावेत. राज्य शासनाने आतापर्यंत 7 हजार 43 घरकुलांना मंजुरी दिली आहे.