वेंगुर्लेत जागतिक नारळ दिन साजरा : महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेचे आयोजन
वेंगुर्ले / वार्ताहर:
सद्यस्थितीत सर्व फळ पिकांवर हवामान बदलाचे फार मोठे परीणाम होऊन पिकांचे नुकसान होते. हे लक्षात घेऊन नारळ या पिकावर शेतकऱ्यांनी लक्ष घातल्यास खत व पाणी एवढय़ाचा वापर केल्यास हे नारळ पिक दरवर्षी शेतकऱ्यांसाठी 100 टक्के भरवशाचे व उत्पन्न देणारे पिक असून प्रत्येक शेतकऱ्यांनी किमान आजच्या नारळ दिनी 5 तरी नारळाची रोप लावून आपल्या उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न करा. असे प्रतिपादन जिल्हा दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष तथा कृषिभूषण पुरस्कर प्राप्त शेतकरी एम. के. गावडे यांनी वेंगुर्लेत आयोजित जागतिक नारळ दिन कार्यक्रमांत अध्यक्ष पदावरून बोलताना केले.
येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या वेंगुर्ले कॅम्प येथील प्रकल्पाच्या सभागृहात दरवर्षीप्रमाणे जागतिक नारळ दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यांत आला होता. या कार्यक्रमांत नारळ पेंडीचे पुजन पारंपारीक पध्दतीनुसार कुंकू-हळद व पुष्पहाराने काथ्या कामगार महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकिय संचलिका तथा कृषिभूषण सौ. प्रज्ञा परब यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थि मान्यवरांत कृषिभूषण तथा वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन एम. के. गावड, येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. बी. एन. सावंत, तालुका कृषि अधिकारी हर्षा गुंड, आर्किटेक्ट श्री. डिसोजा, सिंधदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, मुळदे येथील उद्यानविद्या महाविलद्याचे प्रा. डॉ. रंजित धेवारे, प्रा. डॉ. गिरीष उडके, जिल्हा बँकेचे माजी संचालक नितीन कुबल, काथ्या युनिटच्या देवगड येथील संचालिक रंजना कदम, सावंतवाडीच्या श्रुती रेडकर, सावित्रीबाई फुले पतसंस्थेच्या चेअरमन प्रवीणा खानोलकर, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सत्त्यवान साटेलकर, नर्सरीधारक शेतकरी उमेश येरम यांचा समावेश होता.
या प्रसंगी डॉ. बी. एन. सावंत यांनी, 1969 पासून नारळ दिन साजरा केला जातो. केरळच्या तुलनेत आपल्याकडे 35 ते 36 हजार हेक्टर एवढे मोठे क्षेत्र असताना नारळाची लागवड त्या प्रमाणांत झालेली नाही. त्यामुळे त्याचे उत्पादन कमी आहे. आपल्या भागात नारळ पिकांस पोषक वातावरण असूनही त्याची लागवड हवी तशी झालेली नाही. आपण नारळ वृक्षास नुसता कल्पतरू म्हणत आहोत पण तो महाकल्पतरू आहे. संपूर्ण नारळाचे झाड शेवटच्या क्षणापर्यत उपयोगी पडते. त्याच्या प्रत्येक घटक शेकऱ्यांना उपयोगी ठरतो. याचे एक उदाहरण देताना ते म्हणाले, `नारळाच्या झावळ्यापासून उत्तम प्रकारचे गांडुळ खत निर्मीती होते. तसेच नारळापासून कोकनट बॉल, किसलेल्या खोबऱ्यापासून बनविलेले पदार्थ, नारळपाणी यांची मागणी वाढत आहे. नारळ पिक हे भविष्यात उत्पन्नाचे महत्वाचे साधन ठरणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी नारळाची लागवड करावी असे आवाहन केले.
यावेळी तालुका कृषि अधिकारी हर्षा गुंड, आर्कीटेक्ट श्री. डिसोजा, काथ्याच्या व्यवस्थापकिय संचालिका सौ. प्रज्ञा परब, डॉ संजीव लिंगवत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. बी. एन. सावंत, तालुका कृषि अधिकारी हर्षा गुंड, आर्कीटेक्ट श्री. डिसोजा, तर नर्सरीधारक उमेश येरम, नारळ मित्र शेतकरी गोपाळ कोरगावकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व नारळ रोप देऊन सत्कार करण्यांत आला.
या कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख पाहुणे प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. एन. सावंत यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाले. कार्यक्रमांत मान्यवरांचे स्वागत एम. के. गावडे यांनी तर सुत्रसंचालन व आभार सौ. प्रज्ञा परब यांनी मानले. या कार्यक्रमांस नारळमित्र, शेतकरी उपस्थित होते.