प्रतिनिधी/ इचलकरंजी
महाकवी कालिदास यांच्या जीवन व वाड्:मय दर्शनावर प्रकाशझोत टाकणारे ‘रस परमेश कवी’ हे मराठी संगीत नाटय़ सोलापूरच्या श्रृती मंदिर संस्थेने सादर केले. यामध्ये महाकवी कालिदास यांच्यासारख्या संस्कृत भाषेतील श्रेष्ठ नाटककारांवरील अवघड विषयावर प्रा. विद्या काळे यांनी लेखन केलेले आणि त्यांनीच दिग्दर्शित केलेले हे नाटक पेक्षकांच्या पसंतीस उतरले. इचलकरंजी येथील श्रीमंत नारायणराव घोरपडे नाटय़गृहात उपस्थित प्रेक्षकांनी यातील प्रत्येक अभिनयाला भरभरून दाद दिली.
महाकवी कालिदांच्या रचनांवर आजही अभ्यास केला जात आहे. कालिदास यांच्या जन्म काळाविषयी मत-मतांतरे आहेत, तसेच अनेक दंतकथाही प्रसिद्ध आहेत. अभिज्ञानशाकुंतलम्, कुमारसंभवम् आणि मेघदूत अशा अनेक रचना कालिदासांच्या आहेत. नादमधूर भाषा, पदांनीयुक्त शब्दालंकाराचा वापर असलेली प्रवाही भाषा असणाऱया कालिदासांवर संगीत नाटय़ रचने हे नाटय़सृष्टितील शिवधणुष्य उचलण्यासारखे आहे. या नाटय़ाच्या माध्यमातून प्रा. विद्या काळे यांच्या या रचनेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. कालिदासांच्या जीवन आणि साहित्याचा आढावा ‘रस परमेश कवी’ या संगीत नाटय़ाच्या माध्यमातून घेण्यात आला. यामध्ये महाकवी कालिदासाची भूमिका साकारणारे ओंकार मोहोळकर आणि राजकन्या शकुंतलेची भूमिका साकारणाऱया केतकी धामणकर यांच्यातील गद्य-पद्य संवादाने नाटय़ाला वेगळी उभारी दिली.
महाकवी कालिदांसांच्या व्यक्तिमत्वाभोवती अनेक दंतकथां आहेत. यातील एका दंतकथेनुसार कालिदास हे मुळात मठ्ठ व निरक्षर होते. एका हट्टी राजकन्येची खोड मोडण्यासाठी कपटाने तीचे लग्न कालिदासांबरोबर लावून देण्यात आले. या कपटाची उकल झाल्यानंतर देवी कालिमातेचा वरदहस्त लाभल्याने ते खऱया अर्थाने कालिदास ‘महापंडित’ होतात. त्या राजकन्येने विचारलेल्या प्रश्नावर कुमारसंभव, मेघदूत व रघुवंश ही तिन्ही काव्ये म्हणून दाखवतात. पुढे त्या राजकन्येचा पत्नी म्हणून स्विकार न केल्याने तीने दिलेल्या शापानुसार कालिदासाचा अंत एका वेश्येच्या हातून होतो. असे कथानक असलेल्या या नाटकात कालिदासांच्या शाकुंतल व इतर नाटकातील दृष्यरूप लेखिकेने दाखवले आहे. ओंकार पाठक, शर्वरी देशपांडे, अनंत अकोलकर, गीता राजमाने, राजश्री देशपांडे, ओंकार कोप्पा, वेणूगोपाल धोत्रीकर यांच्यासह वीस कलाकारांनी या नाटय़ात सहभाग घेतला. वेणूगोपाल धोत्रीकर आणि मंदार झांबरे यांनी केलेले नेपथ्य सुंदर होते. अद्वैत कुलकर्णी यांचे पार्श्वसंगित होते. राजू धामणीकर, प्रशांत कुलकर्णी, निलिमा वळसंगकर, प्रकाश कासेगावकर, गणेश आंगडी यांची वेशभूषा, रंगभूषा आणि ध्वनीयंत्रणा होती.