शकुंतलेच्या तोंडावर येणारा भुंगा हाकलण्यासाठी ती आपल्या सख्यांना सांगत असते. तेव्हा त्या दोघी दुष्यंताचा धावा कर म्हणून चिडवतात. ते सारे झाडाआडून पहाणाऱया राजाला हीच संधी आहे आपल्याला प्रकट होण्याची, असे वाटते. ‘भिऊ नका, भिऊ नका’ असे स्वगत अर्धवट बोलतो. पण त्याला आपली ओळखही इतक्मयातच द्यायची नसते. राजा लगबगीने पुढे येऊ लागतो. तेव्हा त्याला पाहून शकुंतला आणि सख्या गोंधळून जातात. तेव्हा अनसूया राजाला सांगते, ‘आर्य, विशेष काही नाही. ही आमची प्रिय सखी भुंगा अंगावर आल्यामुळे भ्याली इतकेच.’ असे म्हणून ती शकुंतलेकडे बोट दाखवते. तेव्हा तो शकुंतलेला विचारतो, ‘तपबीप ठीक चाले आहे ना?’ शकुंतला गोंधळते. तेव्हा अनसूया म्हणते, ‘असा थोर पाहुणा लाभला असता का नाही चालणार?’ असे म्हणून ती शकुंतलेला राजाच्या सत्कारासाठी फळे आणि इतर साहित्य आणायला पर्णकुटीत पाठवते. झाडांना घालायला आणलेलं पाणी पाय धुवायला देते. राजाला तिच्या गोड शब्दांमुळेच आपला सत्कार झाल्यासारखे वाटते. प्रियंवदा त्याला सप्तपर्णी वृक्षाच्या पारावर बसून त्याच्या छायेत विश्रांती घ्यायला सांगते. तोही त्या तिघींना विश्रांती घ्यायला सांगतो. त्याला पाहून शकुंतलेच्या मनात चलबिचल सुरू होते. तपोवनाला न शोभणारे मनोविकार उफाळून येतात.
राजाला पाहून अनसूया, प्रियंवदा यांना तो कोण आहे हे जाणण्याची उत्सुकता निर्माण होते. शेवटी अनसूया तो कोणत्या राजषी कुळातला आहे, तपोवनात कशासाठी आला आहे इ.चौकशी सुरू करते. एकीकडे शकुंतला कान देऊन दोघांचे संभाषण ऐकत असते. राजा आपले खरे स्वरुप लपवून आपण पौरव राजाकडे धर्मखात्यावर अधिकारी म्हणून काम करतो असे सांगतो. म्हणून धर्मक्रिया नीट चालल्या आहेत की नाही हे पाहण्यासाठी या तपोवनात आल्याचे सांगतो. तेव्हा अनसूयेला धर्माने वागणाऱयांना पाठिराखाच मिळाल्यासारखे वाटते. तर शकुंतलेला प्रणयभावनेने लाजल्यासारखे होते. तेव्हा त्या दोघांची चलबिचल ओळखून सख्या शकुंतलेला चिडवतात की, ‘आज जर बाबा इथे असते तर, त्यांनी आपली प्राणप्रिय वस्तू ह्या थोर पाहुण्याला देऊन संतुष्ट केलं असतं.’
तो विचारतो, ‘बाबा काश्यप तर नैष्टिक ब्रम्हचारी असूनही ही त्यांची मुलगी कशी?’ तेव्हा अनसूया सांगते की ‘कौशिक कुलनामक कोणी महाप्रतापी राजर्षि शकुंतलेचे जनक आहेत असे समजा. ते हिला टाकून गेल्यावर हिचे लालनपालन आमच्या काश्यपबाबांनीच करून हिला मोठ्ठं केलं. म्हणून ते हिचे वडिल म्हणायचे! ‘टाकून दिलं’ ह्या शब्दांनी राजाची जिज्ञासा चाळवली गेली. त्याने पूर्ण हकिकत ऐकण्याची इच्छा अनसूयेकडे प्रकट केली.