अनसूयेने दुर्वासांकडे शकुंतलेची रदबदली केल्यानंतर त्यांनी उःशाप दिला की, ‘खुणेचा एखादा अलंकार दृष्टीस पडल्यास शापनिवृत्ती होईल.’ प्रियंवदा आणि अनसूयेला माहित असते की, राजाने आपल्या हातातली आपल्या नावाची मुद्रिका शकुंतलेच्या बोटात घातली होती. त्यामुळे पुढे काही घडल्यास ही मुद्रिकाच तिला तारील! त्या दोघी तिथून निघतात. तेव्हा त्यांना दिसते की, त्यांची प्रिय सखी लोडाला टेकून अगदी चित्रासारखी पतिचिंतनात गढून गेलेली असते. आपल्या सख्या जवळ येऊन उभ्या आहेत याचेही तिला भान नसते. पण त्या समजून घेतात. तिचे रक्षण आपल्यालाच करायचेय याची त्यांना जाण असते. ‘मोगरीच्या वेलीवर कोण बाई कढत पाणी शिंडणार?’ असे प्रियंवदा म्हणते. त्या दोघी निघून जातात. यानंतर बराच काळ गेल्याचे सूचित करण्यात येते.
त्यानंतर दोन शिष्य प्रवेश करतात. काश्यपऋषी सोमतीर्थाहून परत आलेले असतात. त्यांनी रात्रीचा कोणता प्रहर आहे हे पाहून येण्यास शिष्यांना सांगितलेले असते. ते जाऊन बघतात, तोपर्यंत उजाडलेलेच असते. चंद्र अस्ताला जाऊन रवीउदय होत असतो. चंद्रोदयाबरोबर फुललेल्या कुमुदिनी आता मिटू लागलेल्या असतात. ज्याप्रमाणे युवतींना त्यांचा प्रियकर सोडून गेल्यावर यातना होतात, तसेच हे दृश्य असते! कण्वमुनी जेव्हा परत येतात, तेव्हा त्यांना शकुंतलेच्या विवाहाची आणि ती गर्भवती असल्याची वार्ता समजते. त्यांना समाधान वाटते. सख्यांना मात्र बराच काळ लोटूनही दुष्यंत शकुंतलेला भेटायलाही आला नाही, याचे खूप दुःख होते आणि रागही येतो. पण हा दुर्वासांच्या शापाचा प्रभाव असावा असेच त्यांना वाटते. त्यामुळेच राजाला तिचा विसर पडला असावा.
पण कण्वांनी शकुंतलेची सासरी पाठवणी करण्याचा निश्चय केलेला असतो. शकुंतला त्यांची मानसकन्या! तिची पाठवणी करताना त्यांना खूप दुःख होते. पण कन्या हे परक्मयाचे धन. ते ज्याचे त्याच्या हाती सोपवले की निश्चिंतपणा येतो.
‘अर्थो हि कन्या परकीय एव।तामद्य सम्प्रेष्य परिग्रहितुः। जातो ममायं विशदः प्रकामः। प्रत्यर्पितन्यास इवान्तरात्मा।।’
असे ते म्हणतात.