जर्मन कवी गटेने म्हटले आहे, ‘जर तुम्हांला उमलणारे फुल, पक्व फळ आणि इतर काही गोष्टी एकाच ठिकाणी शोधायच्या असतील की, ज्यामुळे आत्मा तृप्त होईल आणि मन शांत होईल, म्हणजेच तुम्ही स्वर्ग आणि मर्त्यलोकाला एकाच ठिकाणी पाहू इच्छित असाल, तर माझ्या तोंडून एकच नाव बाहेर पडेल. ते म्हणजे शाकुन्तलम्. जी महाकवी कालिदासाची एक अमर रचना आहे!’ हे गौरवोद्गार ऐकून किंवा वाचून प्रत्येक भारतीयाला कालिदास आपल्या देशात होऊन गेला याचा नक्कीच अभिमान वाटेल!
कालिदास हा उपमांचा ‘सम्राट’ होता. ‘उपमा कालिदासस्य’ ही उक्ती प्रसिध्दच आहे. त्याला सुचणाऱया उपमा इतक्मया चपखल आणि उच्च दर्जाच्या असतात की, वाचणारा विस्मित होतो. उदाहरणादाखल पहायचे झाले तर एका ठिकाणी राजा दुष्यंत शकुंतलेच्या बाबतीत म्हणतो की, ‘ती एक अनाघ्रात फुल आहे, ती अशी एक कोवळी पालवी आहे की, जिच्यावर नखांचे ओरखडे उठलेले नाहीत. एक असे रत्न आहे की, ज्याला कोणी छेदले नाही, आणि असा मध आहे की, ज्याचा स्वाद कुणी अजून चाखला नाही!’ जेव्हा पाचव्या अंकात आश्रमातील दोन तपस्वी तिला राजा दुष्यंताकडे सोडायला जातात तेव्हा त्या तिघांना पाहून दुष्यंत म्हणतो, ‘दोन पिवळय़ा पानांच्यामधे ही कोमल पालवीच्या धुमाऱयासारखी दिसते आहे!’
तर अशा ह्या महाकविचा प्रतिभाविष्कार नाटकात जागोजागी पहायला मिळतो. शाकुंतलाचा पहिला अंक सुरू होतो तो तत्कालिन नाटकांच्या प्रथेप्रमाणे असलेल्या नांदीने! म्हणजे मंगलाचरणाने! ह्यामध्ये ईश्वराला वंदन करून नाटकाचा खेळ रंगण्यासाठी आशीर्वाद घेतले जातात. त्यानंतर नटी आणि सूत्रधार मंचावर प्रवेश करून नाटक सुविहित पार पाडण्यासाठी एकमेकांशी संवाद साधत हे नाटक महाकवी कालिदासांचे असल्याने पात्रांची वेशभूषा, संवाद यांची जय्यत तयारी झालेली आहे. सध्या वसंतऋतुचा काळ असल्याने सारी सृष्टी आनंदून गेली आहे, तृप्त झाली आहे असे वाटते. तसेच इथे जमलेले प्रेक्षकही तृप्त होण्यासाठी नटीने एखादे मधुर गीत गावे म्हणून सूत्रधार तिला आग्रह करतो. तीही तसे करते. त्यामुळे समोरची प्रेक्षकसभा अगदी चित्रासारखी स्तब्ध झाली हे सूचित करतो. आज ह्यांना आपण कोणत्या नाटकाचा प्रयोग दाखवावा बरे? असा प्रश्न पडतो. तेव्हा नटी पुन्हा त्याला आठवण करून देते की, ‘आपण सुरूवातीलाच सांगितले की, आज आपण अभिज्ञान शाकुंतल या अभिनव नाटकाचा प्रयोग करणार आहोत!’ सूत्रधार ते विसरलेला असतो. पण आता त्याला ते आठवते आणि शाकुंतलाचा पहिला अंक खऱया अर्थाने सुरू होतो.