सख्या आणि शकुंतलेचा संवाद आडून ऐकत असलेला राजा मनात म्हणतो, ‘अगं, मी तुझ्यासाठी किती अधीर झालोय तुला माहित नाही. मी तू लिहीलेल्या गीताचा अव्हेर कसा करीन बरं?’ तर सख्या तिला विचारतात की, स्वतःच्या गुणांना एवढी तुच्छ का लेखतेस? शरद ऋतूतील चंद्रिका अंगाला लागेल म्हणून कुणी पदर ओढून घेते का? शेवटी त्या तिला गीत लिहायला लावताच. राजा तर तिच्याचकडे टक लावून बघत होता. शकुंतला गीत रचवू लागते. पण लिहून कसे घेणार? मग सख्या तिला एक मृदु कोवळे कमलपत्र आणून देते. त्यावर नखांनी लिहायला सांगते. ती ते वाचून दाखवते आणि सख्यांना त्यात आपला हेतू प्रकट झालाय की नाही, ते विचारते. तिचे काव्य ऐकून राजा अचानक झाडीतून बाहेर येतो आणि तुला जसा माझा विरह सर्वांगाला जाळतोय, तशीच माझीही अवस्था झाली आहे हे कबूल करतो.
त्याला बघताच एका शिळेवर लिहीत बसलेली शकुंतला पट्कन उठते. तर सख्यांना दोघांच्या मनातला हेतू एकच असून तो इतक्मया लवकर सफल झाल्याचे पाहून आनंद होतो. तेव्हा अनसूया राजाला त्याच शिळेवर महाराजांनी जरा अंग टेकावे, अशी विनंती करते. राजा बसतो. शकुंतला लाजते. प्रियंवदा राजाला काही गोष्टी स्पष्टपणे सांगते की, तुमचे दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे, हे दिसतेच आहे. पण आपल्या राज्यातील लोकांचे दुःखनिवारण करणे हे त्याचे पहिले कर्तव्य आहे! राजाला ते मान्यच असते. पण प्रियंवदा म्हणते की, तुमच्या प्रेमामुळे झुरणीला लागलेल्या हिची कामदेवाने जी दशा झाली आहे, त्यापासून हिला जीवदान द्या! तिच्या चेष्टेमुळे शकुंतलेला खरेतर गुदगुल्या होत असतात. पण राजाची बाजू घेऊन ती बोलू लागते.
तेव्हा राजा म्हणतो, ‘अगं माझं मन मी तुलाच दिलं आहे. पण तुला ते अजूनही खरं वाटत नाही? तुझ्या नयनबाणांनी तू मला मारतेच आहेस!’ तेव्हा अनसूया राजाला सांगते, ‘राजांची अनेक प्रेमपात्रे असतात. तेव्हा आमच्या या प्रियसखीबद्दल तिच्या बांधवांना दुःख होणार नाही असे वाग म्हणजे झालं!’ तेव्हा राजा तिला माझ्या अनेक भार्या असल्या, तरी माझ्या कुळाला आधार देणाऱया दोघीच. एक म्हणजे पृथ्वी आणि तुमची सखी!