शकुंतलेसोबत शार्ङ्गरव आणि गौतमीला जाण्याची अनुमती काश्यपमुनी देतात. शकुंतलेला वाटते की, मलयगिरीच्या कडय़ावरून उपटून टाकलेल्या चंदनाच्या झाडाप्रमाणे बाबांच्या मांडीचा आधार सुटल्यावर तिकडे परमुलखात जीवन कसे कंठू? तेव्हा बाबा तिची समजूत घालतात की, एका कुलिन राजाच्या गृहिणीचे पद तू भूषवणार आहेस. त्याच्या घरच्या मोठमोठय़ा कार्यांमध्ये सहभागी होऊन तुझा वेळ सत्कारणी लागेल. शिवाय तुझ्या पोटी सूर्यासारखा तेजस्वी पुत्र जन्माला येईल, तेव्हा त्याचे कोडकौतुक, संगोपन करताना तुला माझा विरह अजिबात जाणवणार नाही. शकुंतला बाबांच्या पाया पडते. ‘जे तुला प्राप्त व्हावे अशी माझी इच्छा आहे, ते सारे तुला प्राप्त होवो!’ असा आशीर्वाद देतात.
ती पुन्हा सख्यांना भेटायला जाते आणि दोघींना जवळ घेऊन आलिंगन देते. सख्या तिला आठवण करून देतात की, जर तुझी राजाला लवकर ओळख पटली नाही, तर तुझ्या बोटातली मुद्रिका त्याला दाखव! त्यांचे बोलणे चालू असतानाच शार्ङ्गरव त्यांना निघायला उशीर होत असल्याची आठवण करून देतो. शकुंतला बाबांना विचारते, ‘आता हे तपोवन मला परत केव्हा दिसेल?’ तेव्हा तू आपल्या पतिराजाबरोबर आपल्या पुत्राला घेऊन येशील, तेव्हा ह्या आश्रमासह तपोवन तुला दिसेल असे ते सांगतात. गौतमी पुन्हा शकुंतलेला वेळेवर निघण्याची घाई करते.
जाता जाता शकुंतला पित्याला सांगते की, माझ्यासाठी आधीच कृश झालेले शरीर आणखी झिजवू नका. काश्यप तिला ‘माझी काही काळजी करू नकोस. सुखाने जा. तुझा प्रवास सुखकर होवो’ अशा शुभेच्छा देऊन कुटीकडे जायला निघतात. सर्वजण आपापल्या ठिकाणी निघू लागतात. शकुंतला दिसेनाशी होईपर्यंत सख्या तिच्याकडे पहात राहतात. तेव्हा दोन्ही सख्यांना काश्यप भानावर आणतात. त्यांनी दुःखावेग आवरून आता नित्यकर्मे करावीत असे सुचवतात. दोघींना धर्मकृत्यात भाग घेणारी सखी शकुंतला आठवते. तिच्याशिवाय हा आश्रम सुनासुना भासतो अशा भावना त्या व्यक्त करतात.
निरोप घेणाऱया माणसाबद्दल प्रेम आणि दुःख एकाच वेळी वाटणे ही जगाची रीतच आहे, असे ते समजावतात. मग विचार करून आपण शकुंतलेला तिच्या पतिच्या घरी पाठवून आपण निश्चिंत झालो असे वाटते. कन्या हे परक्मयाचे धन आहे. त्यामुळे आज माझ्या मनाला स्वस्थता लाभली आहे. कारण ज्याची ठेव त्याला मी परत केली आहे!
सर्वजण जातात आणि इथेच चौथा अंक समाप्त होतो.