कंचुकी सर्वांना कुठे जायचे आहे याचे मार्गदर्शन करतो. शार्ङ्गरव आणि बरोबरचा तपस्वी शारद्वत ते वैभव पाहून थोडे गांगरून जातात. शार्ङ्गरव शारद्वताला सांगत असतो की, हा राजा ऐश्वर्यसंपन्न आहे. तरीही तो कधी मर्यादा सोडून वागत नाही. कोणत्याही वर्णाचा कुणीही असला तरी त्याला कमी लेखत नाही. तरीही आपल्यासारख्या एकांतप्रिय माणसांना हा राजवाडा म्हणजे लोकांनी व्यापलेले अग्निला अर्पण केलेले सदन आहे. शारद्वत म्हणतो तू शहरात आल्यामुळे तुला असे वाटतेय. तेवढय़ात शकुंतलेचा उजवा डोळा लवत असून काही तरी दुश्चिन्ह झाल्यासारखे तिला वाटते. तसे ती गौतमीला सांगते. गौतमी तिला कुलदेवतेची आठवण करून देते. ती सर्वांचे भले करील असे सांगते. बोलता बोलता ते राजाच्या दालनात येतात. राजा आसनावरून उठून खाली येऊन त्या सर्वांचे स्वागत करतो.
राजपुरोहित त्यांना सांगतो की, दुष्यंत राजाने नुकतेच राजसभेचे कामकाज संपवून तो इथे आला आहे. राजाची कर्तव्यनि÷ा पाहून शार्ङ्गरव त्याला म्हणतो….
भवन्ती नम्रास्तरवः फलागमैः नवम्बुभिर्दूरविलम्बनि घनाः।
अनुद्धता सत्पुरुषाः समृद्धिभिः स्वभाव एवैष परोपकारिणाम्।।
अर्थात् फळांनी लगडलेले वृक्ष नम्र होतात, नवीन पाणी भरलेले मेघ ओथंबून येतात. वैभवात असतानाही सज्जन लोक नम्र असतात. परोपकारी लोकांचा हा स्व-भावच आहे. प्रतीहारी राजाला म्हणतो, ज्याअर्थी यांचे चेहरे प्रसन्न दिसताहेत, त्याअर्थी ऋषिंचे कार्य चिंता करण्यासारखे नसावे. तरीही त्यांच्याबरोबर शकुंतलेला पाहून ही बुरखा पांघरून ह्यांच्याबरोबर आलेली देखणी स्त्री कोण हे समजत नाही. राजाला वाटते हिच्याकडे निरखून पाहणे बरे दिसत नाही. ही परस्त्री आहे! पण शकुंतलेचे ह्रदय मात्र धडधडू लागते. पण ती आर्यपुत्राचे प्रेम ओळखून मनाला धीर धरायला सांगते.
राजपुरोहित तपस्व्यांचा यथोचित सत्कार करतो आणि ऋषिंचा त्यांनी आणलेला निरोप राजाने ऐकावा असे सांगतो.
दोघे तपस्वी राजाचा जयजयकार करतात. त्याला आशीर्वाद देतात. राजाही त्यांना मुनिंचे कुशल विचारतो. शार्ङ्गरव राजाला निरोप सांगतो की, ‘गांधर्वविधीने तू माझ्या मुलीशी विवाह केलास, त्याला मी आनंदाने मान्यता देत आहे. तू तुझी सहधर्मचारिणी म्हणून गर्भवती असलेल्या तिचा स्वीकार कर!’