एकपेडी वेणी घातलेली शकुंतला प्रवेश करते. सर्वदमनच्या वल्लीचे रूप पालटायला हवे होते, पण ते तसेच राहते हे पाहून तिला आश्चर्य वाटते. तिला एकदा वाटते की, सानुमती म्हणाली तेच बरोबर असावे. तिचा भाग्योदय जवळ आला असेल का? तिला पाहून राजाला तिची ओळखच पटते. कारण हिची विरहव्रत पाळल्याने वस्त्रे मळली आहेत. उग्र व्रतामुळे मुख कोमेजले आहे. शुद्धशील अशा हिने दीर्घकाळ व्रतपालन केले आहे. पण हिला न ओळखणारा मी मात्र क्रूर आहे. शकुंतलेचेही राजाकडे लक्ष जाते, तेव्हा तो पश्चात्तापामुळे निस्तेज झालेला दिसत असतो. तेव्हा तोच का हा राजा अशी शंका तिला येते. मग आपल्या बाळाच्या हातातल्या मंगलराखीला स्पर्श करून हा कोण बरे विटाळत आहे? सर्वदमनही तीच तक्रार करीत असतो की, हे गृहस्थ आपला मुलगा म्हणून मला कवटाळीत आहेत. राजा शकुंतलेला म्हणतो, ‘मी तुझ्याशी एवढा कठोर वागलो, तरी तू मला ओळखले आहेस. तुझ्यावर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही हे माझे भाग्य आहे’ ते ऐकून शकुंतलेचीही खात्री पटते की हा आपला पती दुष्यंत आहे. तोही आनंदाने म्हणतो की, मला झालेले विस्मरण आता संपलेय आणि तूही पूर्वीसारखी माझ्या समोर माझ्या भाग्याने उभी आहेस. जशी ग्रहणातून मुक्त झालेल्या चंद्राला रोहिणी अकस्मात भेटते तशी!
शकुंतला दाटल्या कंठाने राजाचा जयजयकार करते. ते ऐकून राजा धन्य होतो. तिची अवस्था तो समजू शकतो. तेवढय़ात तिचा बाळ तिला हे कोण आहेत असे विचारतो. तेव्हा गहिवरून ती म्हणते तुझे भाग्यरवी आहेत ते! राजा तिची अवस्था पाहून पश्चात्तापदग्ध होऊन तिच्या पायां पडतो. तेव्हा शकुंतला संकोचून त्याला उठवते. ती म्हणते की, माझ्या हातूनच पूर्वी काही तरी पाप घडले असणार, त्याचे फळ मला मिळाले. म्हणूनच तुम्हांला विस्मरण होऊन मूळ दयाळू असूनही माझ्याशी कठोरपणे वागलात. त्यांचा एकमेकांशी संवाद सुरू होतो. घडामोडी अशा घडल्या त्यासंबंधी ते बोलतात. राजा सांगतो, पूर्वी मी तुझ्याशी बेपर्वाईने वागलो. पण आता मी तुझे अश्रू पुसून तुला आतापर्यंत दिलेले दुःख पूर्ण धुवून काढीन. तिचे अश्रू तो खरेच पुसतो. तेव्हा त्याच्या बोटातली अंगठी ती पाहते आणि म्हणते, हीच ती नाममुद्रिका! राजाही सांगतो की, ही अंगठी सापडल्यानेच माझी स्मृती परत आली.
राजा ती मुद्रिका तिच्या हातात घालू पाहतो. तेव्हा शकुंतला ती अंगठी राजाच्याच हातात असू द्या असे सांगते. कारण तिचा आता त्या अंगठीवर विश्वास नसतो. तेवढय़ात यातली प्रवेश करतो. तो राजाला म्हणतो, दैवयोगाने आपल्या धर्मपत्नीची आणि पुत्राची भेट झाली हे आपले महद्भाग्य आहे!