एखाद्या पशुप्रमाणे सजवलेल्या चारुदत्ताला वधस्तंभाकडे घेऊन जात असताना त्याचा अखेरचा निरोप घेण्यासाठी नगरजन आले होते. त्यांना अतीव दुःख होत होते. पण ते काहीच करू शकत नव्हते. तेव्हा चांडाळ लोकांना दूर करीत होते. इथे काही पहाण्यासारखे नाही, असे सांगत होते. त्यातल्या एका चांडाळाच्या बोलण्यानुसार तिथे लोकांनी इतका अश्रूपात केला, की त्यामुळे जमीन भिजून धूळही उडेनाशी झाली. चारुदत्ताचेही समोरच्या घरांकडे लक्ष जाते, तेव्हा घरांच्या गवाक्षातून डोके बाहेर काढून ‘हाय चारुदत्त’ असे म्हणून त्यांचे डोळे एखाद्या भरलेल्या तळय़ाप्रमाणे वहात आहेत, असे वाटत होते. दोघेही चांडाळ चारुदत्ताला तिथल्या चौकात आणून नगारे वाजवून घोषणा करण्यासाठी आणतात.
ते दोघे ओरडून लोकांना चारुदत्ताची माहिती सांगत असतात. ‘हा श्रे÷ाr विनयदत्ताचा नातू आणि सागरदत्ताचा पुत्र असून याचे नाव चारुदत्त आहे. पापकर्म करणाऱया याने धनलोभाने पुष्पकरंडक जीर्णोद्यानात नेऊन वसंतसेनेचा गळा दाबून तिला ठार केले. हा मुद्देमालासह पकडला गेला.
त्याने स्वतःच हा गुन्हा कबूल केलाय. त्यामुळे राजा पालकाने आम्हा दोघांना आदेश दिलाय की, ह्याला ठार मारावे. असा गुन्हा दुसऱया कोणी केला, तरी राजा पालक त्याला अशीच शिक्षा देईल.’
चारुदत्त स्वतःशीच म्हणतो की, ‘एकेकाळी माझ्या पवित्र कुळात यज्ञयागादी करून वेदपठण केले जात असे. तेव्हा त्याचा लाभ घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणात लोकांची गर्दी जमत असे. आज मात्र माझ्या मरणाची घडी जवळ आली असताना तेच कुळ पापी ठरत आहे. चुकीच्या लोकांद्वारे ते घोषित केले जात आहे. तो खिन्न होऊन आकाशाकडे पहात म्हणतो,’
प्रिये वसंतसेने, ‘शुभ्र दंतपक्ती, लालबुंद ओठ आणि त्यांनी अमृतपान करणारा मी आज अपयशरूपी हलाहल पिऊन मृत्युला सामोरा जातोय. मी काय करू? मी असहाय्य आहे म्हणून ह्या लोकांचं सारं बोलणं ऐकून घेतोय!’ तेवढय़ात चांडाळ पुन्हा एकदा लोकांना दूर करून चारुदत्ताला मारून टाकण्यासाठी नगराबाहेर नेण्याची घोषणा करतात.
चारुदत्त आपला मित्र मैत्रेयाला अखेरची हाक मारतो. वडिलांची आठवण काढतो. तो त्या चांडाळांकडे आपल्या पुत्राला अखेरचे पहाण्याची इच्छा प्रकट करतो. तेवढय़ात मैत्रेय रोहसेनला बरोबर घेऊन येतो. तो त्या निष्पाप मुलाला सांगतो, ‘बाळा, तुझ्या बाबांना भेटून घे. तुझ्या पित्याला हे लोक मारायला घेऊन चाललेत.’ मुलगा विलाप करून रडू लागतो. मैत्रेयही आक्रोश करू लागतो.