तिसऱया अंकात विदूषक आणि चारुदत्त रेभिलच्या गाण्याची मैफील ऐकून बाहेर पडलेत. त्यावर त्यांची चर्चा चालू आहे. चारुदत्ताच्या मनात अजूनही ते गाणे रेंगाळते आहे. तेव्हा विदूषक त्याला तंद्रीतून बाहेर आणतो आणि आता पहाट व्हायला आल्याची जाणीव करून देतो. घरी जाणे आवश्यक आहे, याची आठवण करून देतो. दोघे चारुदत्ताच्या घरी येतात. झोपेतून उठलेला चेट दार उघडून दोघांना आत घेतो. त्यांना पाय धुवायला आणि प्यायला पाणी देतो. चारुदत्त मैत्रेयाच्या (विदूषक) पायावर पाणी घालण्यासाठी स्वतः तांब्या हातात घेतो. मैत्रेय ब्राह्मण म्हणून त्याला एवढा मान देत असतो. तेव्हा विदूषक त्याला म्हणतो, ‘जसे सापांमध्ये एखादा दुतोंडय़ा साप असतो, तसा सर्व ब्राह्मणांत मी क्षुल्लक ब्राह्मण आहे!’ स्वतःला तो कमी लेखतो. तरी चारुदत्त म्हणतो, ‘मी तुझे पाय तरीही धुणार. कारण हा दागिन्यांचा डबा आता मला तुझ्याकडे सोपवायचाय.’ जे दागिने पहिल्या अंकातच चारुदत्ताकडे सांभाळून ठेवण्यासाठी वसंतसेनेने दिलेले असतात. ते दिवसा चारुदत्त आणि रात्री विदूषकाच्या ताब्यात असतात. विदूषक हे काम करायला कंटाळलेला असतो. ते वसंतसेनेकडे परत करायला निघतो. तेव्हा चारुदत्त त्याला अडवतो. जोपर्यंत वसंतसेना परत न्यायला स्वतः येत नाही, तोपर्यंत हे द्यायचे नाहीत असे चारुदत्त त्याला बजावतो. दोघांनाही झोप अनावर झालेली असल्यामुळे दोघे झोपी जातात……
घरात सगळी सामसूम झाल्यावर शर्विलक नावाचा चोर दबक्मया पावलांनी जमिनीवर रांगत, रांगत भिंतीला मोठे छिद्र पाडून घरात प्रवेश करतो. तो चौर्यकलेत निपुण असलेल्या स्वतःचीच प्रशंसा करतो. विदूषक दागिने सांभाळून ठेवण्याच्या चिंतेत आहे. तो झोपेत बडबडतो आणि चोरी होण्याच्या भीतीने चारुदत्ताला तो डबा द्यायला लागतो. पण घरात आलेला शर्विलक तो डबा हातात घेतो. तो बाहेर पडणार एवढय़ात रदनिका तिथे येते. ती वर्धमानकाला बोलवायच्याऐवजी विदूषकाला हाक मारायला जाते. शर्विलक तिला मारायला धावतो, पण ती बाई आहे, हे समजल्यावर तिला मारायचे सोडून घराबाहेर पडतो. रदनिका जोरात ओरडू लागते. विदूषक आणि चारुदत्त जागे होतात.
चारुदत्ताची रसिकता उफाळून येते. तो चोराने भिंतीला पाडलेल्या कलात्मक छिद्राची प्रशंसा करतो. तर विदूषक आपण वेळीच हे दागिने चारुदत्ताकडे झोपेतच ताब्यात देण्यात केवढे चातुर्य दाखवले हे सांगतो. पण चारुदत्त त्यावर काही बोलत नाही. उलट तो त्या चोराची प्रशंसा करतो. कारण त्याने किती परिश्रम करून भिंतीला कलात्मक छिद्र पाडलेले असते! तसेच तो अगदीच रिक्त हस्ते गेला नाही याचेही त्याला समाधान वाटते.
विदूषक कपाळावर हात मारतो. तो चारुदत्ताला आठवण करून देतो की, ते दागिने वसंतसेनेने ठेव म्हणून सांभाळायला दिलेत, तेव्हा वास्तवाचे भान येऊन चारुदत्त मूरच्छित पडतो. शुद्धीवर आल्यावर त्याच्या मनात विचार येतो की, दागिने चोरीला गेलेत, यावर लोकांचा विश्वास बसणार नाही, कारण तो स्वतः निर्धन झाला आहे. तो दुःखी होतो.
चारुदत्ताची पत्नी धूता हिला जेव्हा सारा वृत्तान्त कळतो, तेव्हा तिलाही दुःख होते. लोकनिंदेपासून आपल्या पतिला वाचवण्यासाठी ती तिला माहेरून मिळालेला रत्नहार विदूषकाकडे देते. तो घेऊन विदूषक चारुदत्ताकडे जातो, पण तो हार त्याला वसंतसेनेकडे नेऊन देण्यापासून रोखतो. तरीही चारुदत्त आपली प्रति÷ा वाचवण्यासाठी तो हार वसंतसेनेकडे पाठवतोच. चोरीची घटना लपवण्यासाठी तो वर्धमानकाला ते छिद्र लिंपायला सांगतो. जाता जाता मैत्रेयाला म्हणतो, ‘मित्रा, मी दरिद्री नाहिये. जिथे माझी परिस्थिती पाहून घर चालवणारी माझी पत्नी धूता आहे! तू नीघ आता!’ असे म्हणून स्वतः स्नान- वंदनादि कार्यासाठी तिथून चालता होतो.