चौथ्या अंकाच्या शेवटी वसंतसेना भर पावसात कसलीही पर्वा न करता चारुदत्ताला भेटायला निघते हे आपण पाहिले. पाचव्या अंकाच्या पहिल्या दृश्यात विदूषक कोणता निरोप घेऊन येतो याची उत्कंठा असलेला चारुदत्त त्याची वाट पहात असतो. तेवढय़ात मैत्रेय येऊन त्याला सांगतो की, वसंतसेनेने त्या रत्नावलीचा स्वीकार केला आहे. तसेच संध्याकाळी ती त्याला भेटायला येणार आहे. वसंतसेनेकडून त्याचा योग्य आदरसत्कार न केल्याने आणि रत्नहारही ठेवून घेतल्याने विदूषकाला तिचा रागच आला होता. म्हणून त्या वेश्येशी चारुदत्ताने कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवू नये असे त्याला वाटत होते. तेव्हा चारुदत्त खिन्न होऊन म्हणतो, ‘मित्रा, घोडा वेगाने पळण्यासाठी जोर लावतो. पण शक्ती क्षीण झाली की, एक पाऊलही तो पुढे टाकू शकत नाही. त्याचप्रमाणे माणसाच्या चंचल प्रवृत्ती सर्वत्र भटकू पाहतात. पण जेव्हा कुठेही सफल होत नाहीत, तेव्हा त्या परत मनात गोळा होतात. ज्याच्याकडे धन आहे, त्याच्याकडेच ती जाणार!’ असे उघड बोलणारा चारुदत्त मनात मात्र वसंतसेनेबाबत वेगळाच विचार करत असतो. ‘वसंतसेना तशी नाही. ती गुणांनीच वश होणारी आहे!’ वसंतसेना सायंकाळी आपल्याला भेटायला येणार आहे हे चारुदत्ताला कळल्यावर चारुदत्त मैत्रेयाला म्हणतो, ‘मित्रा, येऊ दे तिला. संतुष्ट होऊनच परत जाईल!’
पाचव्या अंकातील दुसऱया दृश्यात जोरदार पाऊस येणार असल्याचे सूचन चेटाच्या कथनातून होते. तो कुंभीलक नावाचा चेट चारुदत्ताला वसंतसेना त्याच्याकडे येत आहे, हे सांगण्यासाठी आलेला असतो. त्यावेळी चारुदत्त एका पुष्पवाटिकेत बसलेलाअसतो. त्याच्याबरोबर त्याचा मित्र विदूषकही असतो. पण त्या वाटिकेचे दार बंद असल्याने चेट बाहेरून बारीक दगड आत मारतो. तो विदूषकाला लागतो. तेव्हा ‘चारी बाजूनी बंद असलेल्या ह्या वाटिकेत दगड कुठून येताहेत?’ असे स्वतःशीच बोलतो, तेव्हा वळचणीला असणाऱया कबूतरांनी खेळताना ते टाकले असावेत असे चारुदत्त म्हणतो. पण विदूषकाला इकडे तिकडे पाहिल्यावर कुंभीलक दिसतो. विदूषक त्याचे स्वागत करतो. तेव्हा तो चारुदत्ताला सांगतो की, ‘वसंतसेना आली आहे.’चारुदत्त वसंतसेना भेटायला खरेच आली आहे, हे जाणून इतका खुश होतो की, आनंदाने नेहमीप्रमाणे काहीतरी बक्षिस देण्यासाठी म्हणून गळय़ाजवळ हात फिरवतो. पण त्याच्याकडे मौल्यवान असे काहीच नसते. पण आपल्या खांद्यावर असलेले उपरणे तो बक्षिस म्हणून चेटाला देतो. चेट त्याला प्रणाम करून निघून जातो. विदुषकाला चारुदत्ताला झालेला आनंद आवडत नाही.