शकार आणि विदूषकाची मारामारी चालू असताना विदूषकाच्या काखेतून दागिन्यांचा डबा खाली पडतो. दागिने विखुरतात. चारुदत्ताला हे आणखी एक आपले दुर्दैव आपल्या सुटकेच्या आड येत आहे असे वाटते. तेव्हा त्या पडलेल्या दागिन्यांविषयी तिथले पंच त्या वृद्धेला ते दागिने ओळखण्यासाठी सांगतात. पण ती त्या दागिन्यांसारखे दिसत असले, तरी ते नाहीत असे सांगते. ते चारुदत्ताला पुन्हा खरे बोलण्याविषयी बजावतात. तेव्हा चारुदत्त हे दागिने तसेच आहेत, पण हे माझ्या घरून आलेले दागिने आहेत असे सांगतो. तेव्हा तो जर खरे बोलला नाही, तर तुला दंडतर होईलच, पण अंगावर चाबकाचे फटकेही पडतील, ते सहन करावे लागतील असे सांगतात. चारुदत्त पुन्हापुन्हा कळवळून सांगतो की, त्याने कोणतेही पाप केलेले नाही. पण त्याने सांगून काय उपयोग? लोकांना ते समजले पाहिजे. माझ्या कुळातही कोणी पाप केलेले नाही, हे तो परोपरीने सांगतो. पण कोणी ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसते. तेव्हा हताश होऊन तो स्वतःशीच पुटपुटतो, ‘तसंही वसंतसेना जिवंत नसताना तिच्याशिवाय जगण्याला तरी काय अर्थ आहे?’
मया किल नृशंसेन लोकद्वयमजानतो।स्त्रीरत्नश्च विशेषेण शेषमेषोएभिधास्यति।। मृत्यू लोक आणि स्वर्गलोकाविषयी न जाणणाऱया क्रूर अशा माझ्याद्वारे मारल्या गेलेल्या स्त्रीरत्नाविषयी….वसंतसेनेविषयी उरलेली माहिती हा शकारच सांगेल. लगेच संधी साधून तिथे जमलेल्या लोकांना शकार म्हणतो, ‘ऐकलंत?हा म्हणतोय’ मीच मारली तिला ! बघा ह्याने कबूल केलंय. आता ह्याला तुम्ही शिक्षा दिलीच पाहिजे. ह्याला चाबकाचे फटके द्या!
देहदंड द्या!’ न्यायाधीश लगेच आदेश देतात, ‘शोधनक, राजशालक जे सांगतोय, तसे करा. चारुदत्ताला पकडून घेऊन जा!’ शिपाई त्याला पकडतात. ते पाहून वृद्धा त्यांना अडवते. तिलाही बाहेर हाकलून दिले जाते. शकाराला आसुरी आनंद होतो. शेवटी चारुदत्ताला माझ्या मनाप्रमाणे शिक्षा झाली असे बोलून तिथून तो चालता होतो. तेव्हा न्यायाधीश म्हणतात, ‘आर्य चारुदत्त! निकाल देणारा जरी मी असलो, तरी शिक्षेची अंमलबजावणी करणारा राजा पालकच आहे. हा ब्राम्हण जरी पापी असला तरी वध करण्यालायक नाही. तेव्हा ह्याला त्याच्या संपत्तीसह ह्याची राज्याबाहेर हकालपट्टी करावी!’ शोधनक आज्ञेचे पालन करतो. पुन्हा प्रवेश करतो, तेव्हा त्याच्या डोळय़ांत अश्रू असतात. तो राजा पालकाचा निरोप सांगतो की ‘ज्याने धनासाठी वसंतसनेचा वध केला, त्याच्या तेच दागिने गळय़ात घालून बांधून दवंडी पिटून त्याला स्मशानात नेऊन सुळावर चढवावे.’ दुसरा जो कोणी असे करील, त्याचीही अशीच अवस्था होईल, हे सगळय़ा लोकांना कळू देत. असा हा अविचारी हलक्मया कानांचा राजा दुसरे काही करील अशी अपेक्षाच नव्हती.