मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली महापूजा
प्रतिनिधी /पणजी
मुलांमध्ये आध्यात्म आणि देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना गणेश चतुर्थी उत्सवाच्या गौरवशाली इतिहासाबद्दल माहिती द्यावी, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
यंदा प्रथमच दिल्लीतही गणेश चतुर्थीचा सण मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री केजरीवाल यांनीच या भव्य दिव्य अशा पूजा सोहळय़ाचे आयोजन केले होते. त्यांनी सपत्नीक श्रीगणरायाची पूजा केली. केजरीवाल सरकारमधील सर्व मंत्र्यांनी या भव्य कार्यक्रमात सहभागी होत तीर्थप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेतला. या सोहळय़ाचे सर्व टीव्ही चॅनेल आणि सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.
या कार्यक्रमात दिल्ली स्थित गोमंतकीयांनीही हजेरी लावली. तर स्थानिक गोमंतकीयांनी विविध सामाजिक प्रसार माध्यमावरून हा कार्यक्रम घर बसल्या कुटुंबियांसह पाहिला.
गणेशोत्सवानिमित्त देशात उत्साहाचं वातावरण असून सर्वत्र गणेशभक्त मोठय़ा श्रद्धेने लाडक्मया बाप्पाची आराधना करत आहेत. गणेश पूजन कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी आपल्या सुरिल्या आवाजाने भक्तांना मंत्रमुग्ध केले. त्याचबरोबर प्रख्यात गायक सुरेश वाडकर व पद्मा वाडकर यांनी आरती सादर केली. सुरेश वाडकर आणि 21 पंडितांसोबत महाआरती करण्यात आली, त्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह सर्व मंत्री आणि मान्यवरांनी भाग घेतला. शेवटी, सुरेश वाडकर आणि पद्मा वाडकर यांनी 30 नृत्यांगनांसह सादरीकरण केले.
गणेश चतुर्थी निमित्ताने देशातील सर्व नागरिकांना संबोधित करताना श्री. केजरीवाल यांनी, ‘श्रीगणेशाच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती यावी’, अशी प्रार्थना केली. आमचे आदरणीय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पुण्यात प्रथमच सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा केला. पुढे, चळवळ सुरू करण्यासाठी त्यांचे प्रयत्न मोलाचे ठरले. या गणेशोत्सवाने स्वातंत्र्य चळवळीतील लोकांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गणेश चतुर्थी देशातील लोकांना एकत्र आणण्याचा आणि त्यांच्यामध्ये देशभक्ती निर्माण करण्याचा एक मार्ग बनला. त्यांनी एकत्र येऊन गणपतीची पूजा केली आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकत्र लढले. आपण सर्वांनी आपल्या मुलांना अध्यात्म आणि देशभक्तीच्या या विशेष मिश्रणाबद्दल शिकवले पाहिजे. आपण सर्वांनी आपल्या मुलांमध्ये अध्यात्म आणि देशभक्तीची ही भावना विकसित केली पाहिजे’, असे केजरीवाल म्हणाले.