एका बाजूला कोरोना संकट आणि दुसऱया बाजूला महागाईचे वाढते चटके यामुळे सर्वसामान्य माणूस अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे. या छळ छावणीतून त्याची सोडवणूक कशी करायची याचा विचार देशातील सत्ताधारी कधी करणार याकडे सर्वसामान्य माणूस आस लावून आहे. गेल्या मार्च महिन्यापासून आतापर्यंत कोरोनात आलेले हे तेरा महिने महागाई वाढवणारे ठरले आहेत. मागणी आणि पुरवठय़ाबाबत असलेले बाजारपेठेतील नियमसुद्धा खोटे ठरताना जनतेने याच काळात अनुभवले. वस्तूंचे दर कमी का होत नाहीत या प्रश्नाचे उत्तर द्यायला कोणीही तयार नाही. महागाई असली पाहिजे असे सांगणारे अर्थतज्ञ लोकांचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी मात्र काही सुचवत नाहीत. त्यांच्या हातातही काही राहिले नसावे. इंधनाच्या वाढत्या किमतीचा फटका सर्वसामान्यांना बसतानाही दर कमी होत नाहीत. खूप दिवस लोकांची परीक्षा पाहिल्यानंतर 13-14 पैशाने दर उतरवण्यात तेल कंपन्या धन्यता मानतात. वाढत्या इंधन दरामुळे महागाई मात्र वाढलेली आहे. यावषी सलग तिसऱया महिन्यात महागाई दर उंचावत 7.39 टक्क्मयांच्या चिंताजनक पातळीवर झेपावला आहे. गेल्या आठ वर्षातील हा उच्चांकी दर आहे. घाऊक बाजारपेठेत इतकी महागाई झाली तर किरकोळ बाजारात त्याचे काय परिणाम होणार याचा विचार करणेही सर्वसामान्यांना अंगावर काटा आणणारे ठरत आहे. स्वयंपाकासाठी लागणाऱया तेलाचा झालेला दुप्पट दर, डाळींची वाढलेली किंमत, प्रत्येक जीवनावश्यक वस्तूचा वाढता दर यांचे दुःख सांगायचे कुणाला अशी त्यांची अवस्था आहे. कधी काळी महागाई विरोधात आवाज उठवणारे पक्ष एक तर सत्ताधारी बनले किंवा काळाच्या ओघात लयाला गेले. त्यामुळे जनतेचा आवाज बनून नेत्यांनी रस्त्यावर उतरायचे दिवस संपले. 1992 नंतर एक काळ असा आला होता, मध्यमवर्गाला आपण नवश्रीमंत झाल्याची चाहूल लागली. सर्वसामान्यांचे प्रश्न, त्यांची दुःखे वेदना आणि समस्या याच्याकडे पाहणे त्या वर्गाने सोडून दिले. सर्वसामान्यांचा आवाज घेऊन रस्त्यावर उतरणाऱया लोकांकडे हीच मंडळी तुच्छतेने पाहू लागली. बदलत्या स्थितीत आपला वर्ग बदलतो आहे असा भास त्यांना झाला. अचानक वाढू लागलेले उत्पन्न आणि उंबऱयात हात जोडून उभे राहिलेले सुख त्यांना इतके मानवले की आपण गरीब वर्गाचे प्रतिनिधित्व करतो आणि त्याच्या दुःख वेदना मांडून सोडवण्यात पुढाकार घेतो हेच तो विसरून गेला. त्यांचे मतदानाचे प्राधान्य बदलत राहिले. धर्म, राष्ट्रवाद या मनात कुठेतरी दडून राहिलेल्या विचारांनी इतकी मोठी उचल खाल्ली की त्यामागे सर्वच प्रश्न दबून गेले. आज सर्वसामान्यांचे दुःख मांडण्यासाठी तो वर्ग आहे किंवा नाही, असेल तर कुठे आहे असा प्रश्न समाज विचारू लागला आहे. पण त्यावेळी सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू लागलेला हा नवश्रीमंत मध्यमवर्ग आता हळूहळू स्वतः संकटात सापडू लागला आहे. कोरोना संकटाने त्या वर्गाला पुन्हा एकदा मागे रेटण्यास सुरुवात केली आहे. अर्थात या संकटाने तो लागलीच अडचणीत येईल अशातला भाग नाही. मात्र त्याच्या खिशावरसुद्धा वाढता भार त्याची चिंता वाढवू लागला आहे. अशावेळी तो आपल्या पूर्वीच्या भूमिकेवर येतो का हे पहावे लागेल. मार्च महिन्यात महागाई गेल्या आठ वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली. त्याच्या आधी फेब्रुवारीत ती 4.17 टक्के होती. ऑक्टोबर 2012 मध्ये यावषीच्या मार्च महिन्यात होती तशी महागाई होती आणि आज जे देशात मान्यवर मंत्री म्हणून प्रसिद्धी पावले आहेत ते सारे नेते या महागाईच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. सर्वसामान्य माणसाची त्यांना इतकी चिंता लागली होती की, त्यांनी महागाईला ‘डायन’ समजून त्या ‘डायन’ला संपवण्यासाठी महामोर्चा काढला होता. आता 8 वर्षांनी पुन्हा एकदा ती डायन प्रबळ झालेली आहे. केवळ स्वयंपाक घरात लागणाऱया वस्तूच नव्हे तर इंधनापासून विजेपर्यंतच्या प्रत्येक घटकात किमान दहा ते अकरा टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे महागाई वाढायला आणखी निमित्तच मिळाले आहे. सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल अशी कोणतीही घटना घडताना दिसत नाही. त्याच्याकडे असणारी किरकोळ जमापुंजीही या संकटकाळात खर्ची पडली आहे. एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला अशा काळात कोरोनासारख्या व्याधीने ग्रासले तर जगायचे कसे? खाजगी दवाखान्याचा दर आपल्याला परवडणार का आणि सरकारी दवाखान्यात आपल्याला जागा मिळणार का याची चिंता सर्वसामान्यांना ग्रासते आहे. या चिंतेने अनेक ठिकाणी लोकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडत आहेत. पतीचा कोरोनाने मृत्यू झाल्याने पत्नीने आणि पित्याचा मृत्यू झाला म्हणून मुलाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. ज्या वर्गाकडे अशा काळातून तरून जाण्यासाठी पैसा आहे त्या वर्गाचा प्रश्न नाही. मात्र वाढती रुग्णसंख्या आणि कमी पडणारी सरकारी आरोग्य यंत्रणा यामुळे आपले कसे होणार याची चिंता सामान्य माणसांना लागून राहिली आहे. या चिंतेतून निर्माण झालेली अस्वस्थता सध्या सर्वत्र दिसत आहे. महागाई आणि महामारी यांच्या या संकटात अडचणीत आलेला सामान्य माणूस आपल्या कुटुंबाला सावरायचे कसे या चिंतेत वावरतो आहे. एका दिवसात दोन-दोन लाख इतक्मया प्रचंड संख्येने रुग्ण वाढत आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी यंत्रणा कमी पडेल असे इशारे दिले जाऊ लागले आहेत. अशा काळात सामान्य माणसाला दिलासा देणे म्हणजे केवळ गरीब आणि अंत्योदय वर्गातील लोकांना धान्याचा पुरवठा करणे हा होत नाही. महागाई कमी करणे आणि लोकांच्या जीविताची शाश्वती देणे, त्या शाश्वती वर लोकांचा विश्वास बसणे महत्त्वाचे आहे. हा विश्वास निर्माण होण्यासाठी आठ वर्षापूर्वी चिंता व्यक्त करणाऱयांनी आता कृती करायची वेळ आली आहे.
Previous Articleमहिला मल्ल पूजा धांडा कोरोनाबाधित
Next Article क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर कोरोनामुक्त
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.