ऑनलाईन टीम / तरुण भारत
गेल्या काही दिवसांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. या युद्धाचा फटका साऱ्या जगाला बसतो आहे. कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला भिडल्याने भारतातही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. या युद्धापुर्वीच महागाईने नागरिकांच्या नाकी नऊ झाले होते. यातच सद्या सुरु असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ही कच्या तेलाचे भाव वाढल्याने भारतात ही महागाईचा भडका होईल, असा अंदाज तज्ज्ञ वर्तवत आहेत. सध्या केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती काहीशा स्थिर ठेवल्या असल्या तरी महागाई नियंत्रणात ठेवण्यात सरकारला यश मिळालेलं नाही. जीवनावश्यक गोष्टींच्या दरात ही मोठी वाढ झाल्याने भारतात महागाई प्रचंड वाढली आहे.
ही वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवण्याचा विचार करत असल्याची माहिती सद्या समोर आली आहे. किरकोळ महागाई दर ६.०७ टक्के आणि घाऊक महागाई दर १३ टक्क्यांवर पोहोचला आहे. चणा मसूर वगळता इतर सर्व डाळींच्या दरात ४-५ रुपयांनी वाढ झाली आहे. गहू २१०० वरून २६०० रु प्रतिक्विंटलवर पोहोचला आहे. मोहरी 167 रुपये प्रतिकिलो, सोयाबीन 167 रु., शेंगदाणा 190 रु.प्रतिकिलो, वनस्पती तूप 170 रु. प्रतिकिलो, साजुक तूप 490 प्रतिकिलो पर्यंत पोहोचला आहे. एक लिटर दुधासाठी ७५ ऐवजी ७८ रुपये. तर कॉफीच्या किंमतीही ४-५ रुपयांनी वाढल्या आहेत.
यामुळे देशातील सामान्य नागरिकाचे कंबरडे मोडले आहे. कारण सामान्य नागरिकाला मिळाणारा श्रमाचा मोबदला यामध्ये विशेष वाढ झालेली नसली तरी खर्चात मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने शासनाने हे प्रश्न तातडीने निर्गत करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक असल्याचा नागरिकात सुर आहे.