देशात कोरोनामुळे आरोग्य आणीबाणी निर्माण झालेली असताना महागाईचे मळभ आणखी गडद होण्याचे चिन्ह आहे. देशभरात कोरोनाच्या दुसऱया लाटेचा कहर सुरू आहे. ही लाट भयंकर असून, ती नियंत्रणात न आल्यास निर्बंध अजून कडक होतील व त्यातून पुरवठा साखळी कोलमडून महागाईचा भडका उडेल, असा अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वर्तविला आहे. हा अंदाज मागच्या वर्षेभरात उत्पन्नाचा स्रोत आटल्याने नि वैद्यकीय खर्च वाढल्याने अगोदरच मेटाकुटीला आलेल्या जनता जनार्दनाच्या तोंडचे पाणी पळविणाराच म्हटला पाहिजे. तशी महागाईने आधीच रोजची तोंडमिळवणी करणेही अवघड बनले आहे. हे संकेत प्रत्यक्षात आल्यास सर्वसामान्यांची जगण्या-मरण्याची लढाई अधिकच कठीण व तीव्र होण्याची भीती आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. अन्न वा पाण्याशिवाय माणूस जगू-तगू शकत नाही. त्यामुळे अन्य चैनीच्या बाबींवरील खर्चाला फाटा दिला, तरी खाण्यासाठीचा खर्च हा अपरिहार्यपणे करावाच लागतो. परंतु, महागाईचा दर वाढला तर त्याचा थेट परिणाम किचन बजेटवर होतो व एकूणच मानवी जीवन विस्कळीत होऊन जाते. आज देशातील जनतेला याच दुष्टचक्रातून जावे लागत आहे. तसे पहिल्या लाटेपासूनच महागाईचे चटके लोकांना जाणवत आहेत. प्रत्येकाच्या आहारात प्रामुख्याने समावेश असतो तो खाद्यतेलाचा. तथापि, तेलाच्या किमतीतील गेल्या सात ते आठ महिन्यातील वाढ पाहिली, तर तोंडात बोटेच घालावी लागतात. अगदी 85 ते 95 रु. लिटरपर्यंत असलेले तेल आजमितीला 150 रु. प्रति लिटरवर पोहोचते, यास काय म्हणावे? एखाद्या कुटुंबास महिनाकाठी 5 लिटर खाद्यतेल लागत असेल, तर त्याचा केवळ यापोटीचा खर्च 250 रु.नी वाढणे, ही वास्तविक किरकोळ बाब नव्हे. डाळींचे स्थानही स्वयंपाकात असेच अनन्यसाधारण. मात्र, त्यांचे भावही गगनाला भिडलेत. 20 ते 30 रु.नी भाव वधारणे, हे सर्वसाधारण मानता येत नाही. तर आहारातील महत्त्वाचा घटक असलेल्या गहू व तांदळाचे दरही किलोमागे चार ते सात रु.नी वाढलेले दिसतात. याशिवाय मसाल्यापासून ते साखर-गुळापर्यंत प्रत्येक वस्तूचा भाव कमी अधिक प्रमाणात चढाच राहिलेला पहायला मिळेल. भाजीपाल्याचीही हीच कथा. एखादा अपवाद वगळता दहा रु. पावशेरने भाजी मिळेनाशी झाली आहे. ज्या आधारे सगळा स्वयंपाक सिद्ध होतो, तो गॅस सिलेंडरही दीड-दोनशेने वाढणे, म्हणजे या जखमेवर चोळलेले मीठच होय. सरासरी काढायची झाल्यास 1200 ते 1800 रु.नी हे बजेट वाढले, असे म्हणता येईल. त्यात अजून वाढ झाली, तर सामान्यांचे कंबरडे पुरते मोडणार, हे वेगळे सांगायला नको. त्या अर्थी ही महागाई जीवघेणी ठरावी. देशातील मागच्या दोन वर्षांत महागाईचा आलेख समजून घेतला, तर त्यातून आजचे चित्र लक्षात येईल. जानेवारी 2019 मध्ये किरकोळ महागाईचा दर 2.05 टक्के होता. तर या वषी फेब्रुवारीत 5 टक्क्मयांवर असलेला किरकोळ महागाईचा दर मार्चमध्ये 5.5 टक्क्मयांवर पोहोचला आहे. आरबीआयने हा दर 2 ते 6 टक्क्मयांच्या आसपास ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, कोरोनाचा फैलाव पाहता हा दर आटोक्मयात ठेवणे, हे आव्हानात्मक असेल. आजघडीला देशात दिवसाकाठी साडे तीन लाखांच्या आसपास कोरोना रुग्णांची नोंद होत असून दररोज जवळपास 3,000 लोकांचा यात बळी जात आहे. अर्थातच दुसरी लाट अधिकच भयानक म्हणता येईल. त्यामुळेच दिल्ली, महाराष्ट्रात कडक लॉकडाउनचा अवलंब करण्यात आला असून इतर राज्यातही कडक निर्बंध लादलेले पहायला मिळतात. परिणामी वाहतूक वा पुरवठय़ाची साखळी खंडित झाली आहे. वस्तूंच्या वाहतुकीवर दीर्घकाळ निर्बंध राहिले, तर पुरवठय़ावर त्याचा परिणाम होईल नि महागाई वाढेल, असे आरबीआयचे गणित आहे. ते तसे बरोबरच. आज उद्योग सुरू आहेत, हे दिलासादायक. परंतु त्याच्याशी संबंधित घटकांवरही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष विपरीत परिणाम होणार आहे. या साऱयातून आर्थिक अनिश्चितता निर्माण होण्याचा धोका संभवतो. हे सारे टाळण्यासाठी सरकार व आरबीआयलाच योग्य ती पावले उचलावी लागतील. कोरोना पर्वात व्यापाऱयांचे पाच लाख कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. बुडत्याचा पाय खोलात, या उक्तीप्रमाणे सर्वसामान्यांच्या हालाला पारावार व नुकसानीला गणतीच नाही. शब्दशः हा वर्ग ऑक्सिजनवर आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेला सामोरे जाण्याची तयारी वा लसीकरणाच्या पातळीवर बेपर्वाई करणाऱया सरकारने आगामी टप्प्यात तरी सामान्यांना झळ बसणार नाही, यासाठी दक्ष रहावे. चलनवाढीचा दर नियंत्रणात ठेवण्याकरिता आवश्यक उपाय योजावेत. त्याचे योग्य व्यवस्थापन व नियोजन करावे. कोरोनावरील धोरणावरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनीही सरकारला चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या आहेत. अर्थ वा विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींच्या मतांचा आदर करीत आवश्यक सुधारणास सरकारने प्राधान्य द्यावे. त्यातून त्रुटी दूर करता येतील. सध्या एकूणच सर्वत्र निराशेचे व हतबलतेचे वातावरण आहे. आर्थिक संकटामुळे टोकाचे पाऊल उचलण्याच्या घटना वाढू शकतात. मायबाप सरकारने अशा काळात देशवासियांना आधार द्यावा. लसीकरणाची मोहीम व्यापकपणे राबवून अधिकाधिक जणांपर्यंत लस पोहोचावी. त्यामुळे पुढच्या लाटा वा अवघड वाटा सुकर होतील. तसा या वषी चांगल्या पाऊसमानाचा अंदाज आहे. काही क्षेत्रे वगळता उर्वरित क्षेत्रात समाधानकारक स्थिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीही खाली आल्या आहेत. साहजिकच संकटातही सुवर्णसंधी प्रतिबिंबित होते. म्हणूनच कुठलेही ढोल न वाजवता शांतपणे नि धोरणीपणाने पुढचे पाऊल टाकावे लागेल. महागाईचे मळभ दूर झाले, तर नक्कीच वातावरणातील नकारात्मकता हटेल नि जगणे सुसह्य होईल, यात संदेह नाही.
Next Article रशिया प्रसिद्ध करणार शत्रूदेशांची यादी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.